दाऊतपूरात अवैध धंद्याचा पूर!
अवैध धंदेवाल्याना आशीर्वाद कोणाचा?
उस्मानाबाद – तालुक्यातील दाऊतपूर येथे अवैध धंदेवाल्यानी चांगलेच पाय पसरले असून ते कोणाच्या आशीर्वादाने आपले धंदे चालवत आहेत असा प्रश्न सध्या परिसरात चर्चिला जात आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर गावात अवैध दारू विक्री, जुगार सुरू आहेत याबाबत ग्रामपंचायतने ढोकी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. दारूबंदी व्हावी यासाठी ग्रामपंचायत ने ठराव केला आहे. महिला विशेष ग्रामसभेने देखील दारूबंदी करण्याचा ठराव घेऊन देखील गावात सर्रास दारू विक्री केली जात आहे. गावातील रहिवासी असलेले रामेश्वर थोरात यांचा दारू पिऊन अपघात झाल्याने मृत्यू झाला होता. गावातील अनेक संसार उध्वस्त होत असल्याचे पाहून ग्रामपंचायत वारंवार प्रशासनाकडे तक्रार निवेदन देत असताना देखील त्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार घडत आहे. परिसरातील दारफळ, इर्ला, राजुरी, सांगवी या गावातील अनेक जण दारू पिण्यासाठी दाऊतपूर ची वाट धरत आहेत. त्यातून कोरोना चा प्रसार होण्यास चालना मिळत असल्याने आरोग्य विषयक समस्या देखील उद्भवत आहेत. गावात घडत असलेला सारा प्रकार ग्रामपंचायत ने ११ मे आणि १७ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात मांडला आहे. तरी देखील यावरती कारवाई केली जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आमच्या विरोधात तक्रार केली तर ॲट्रोसिटी चा गुन्हा दाखल करू, पोलिसांना आम्ही हफ्ते देतो असे दारू विक्रेते कोणाच्या जीवावर म्हणत आहेत याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. पोलीस प्रशासनाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास अमरण उपोषणाचा इशारा देखील ग्रामपंचायतीने दिला असून निवेदनावर ७० पेक्षा अधिक जागरूक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पोलीस प्रशासन याबाबतीत काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.