Home Blog Page 5

भाजपने टेकले गुन्हेगारांसमोर गुडघे,महंतांना डावलून ड्रग्स प्रकरणातील आरोपीला भाजपाने दिली उमेदवारी!

धाराशिव (आकाश नरोटे)- संत महंत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणतात अलीकडच्या काळात महंत, मठ प्रमुख यांना उमेदवारी देण्याचे प्रमाण वाढले आहे. बिघडलेल्या राजकारणात महंत उमेदवार असतील तर आशादायी चित्र राहील या उद्देशाने अशा उमेदवाऱ्या दिल्या जातात. संस्कृती रक्षक म्हणून स्वतःचा प्रचार करणारा भारतीय जनता पक्षाने मात्र महंतांना डावलून थेट ड्रग्स प्रकरणात आरोपी असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीत नगराध्यक्षपदासाठी भाजपने विनोद गंगणे यांना अधिकृत उमेदवारी दिली मात्र ही उमेदवारी गिरिगोसावी महंत इच्छागिरी गुरुमहादेवगिरी यांना डावलून देण्यात आल्याने भाजपला राजकारण कुठे नेऊन ठेवायचे आहे याचा मेळ लागताना दिसत नाही. महंत इच्छागिरी महाराज हे मोठे प्रस्थ असून क्लीन इमेज आहे सोबत नागपूर येथून त्यांच्यासाठी आग्रह असताना विनोद गंगणे यांना उमेदवारी का दिली गेली हे न उलगडलेले कोडे आहे. तुळजापूर चे राजकारण आ. राणाजगजितसिंह पाटील पाहतात अर्थात तिथे नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्यांच्याच मर्जीतला असणे स्वाभाविक होते. निधी मंजूर करून आणला म्हणून त्यांचा सत्काराचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला त्याचे आयोजक विनोद गंगणे हेच होते. त्यावेळी देखील ड्रग्स प्रकरणावरून मोठी टीका झाली होती. मात्र आता महंतांना डावलून जर भाजप उमेदवारी देत असेल तर ज्यांच्याकडे आर्थिक रसद आहे त्यांनाच उमेदवारी असा नवा पायंडा भाजप मध्ये पडत असून हे राजकारणासाठी धोकादायक आहे. गुन्हेगारांना शासन व्हावे समाज सुधारावा अशी भूमिका सत्ताधारी भाजपकडे असणे अपेक्षित होते प्रत्यक्षात मात्र भाजपने गुन्हेगारांसमोर गुडघे टेकल्याचे यानिमित्ताने चर्चिले जात आहे.

ड्रग्स प्रकरणात मुख्यमंत्र्यांची चुप्पी

तुळजापूर ड्रग्स प्रकरणात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुप्पी राखली आहे. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीत ड्रग्स बाबत त्यांनी ठोस भूमिका कधीच जाहीर केली नाही. मात्र भाजपमध्ये या प्रकरणातील आरोपींचा वावर असून विनोद गंगणे यांना उमेदवारी देऊन आरोपींना गुन्हेगारांना राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप आहे.

सुप्रिया सुळेंचे आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ड्रग्स प्रकरणातील आरोपींना भाजप मध्ये प्रवेश दिल्याच्या संदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले होते, दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र त्याला देखील फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही.

जिल्ह्यात नव्हे राज्यात होणार परिणाम

ड्रग्स च्या विळख्यात अडकलेली तरुणाई आणि प्रमुख राजकीय पक्ष असलेला भाजप त्या गुन्ह्यातील आरोपींना उमेदवारी देत असेल तर त्याचे पडसाद केवळ धाराशिव जिल्ह्यात होणार नसून राज्यभर त्याचा फटका भाजपच्या इमेजला बसणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

अबब… डॉक्टरांचे पथक आले तपासणी करून ट्रॅक्टरने गेले नागपूरला!

प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार बोगस बिलांच्या आजारावर आरोग्य विभाग उपचार करणार का?

धाराशिव : आरोग्य विभागातील गैरव्यवहारांवर प्रकाश टाकणारा आणि प्रशासनालाच हादरा देणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरहून NQAS (नॅशनल कॉलिटी ऍश्युरन्स स्टॅंडर्ड) तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने तपासणी पूर्ण केल्यानंतर जातेवेळी नागपूरला परत जाण्यासाठी MH 24 D 4011 या लातूर जिल्ह्यात नोंद असलेल्या ट्रॅक्टरने प्रवास केला, अशी नोंद अधिकृत बिलांमध्ये असल्याचा सनसनाटी आरोप नागरिक आकाश लहु खंडागळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.

तक्रारीनुसार उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत सत्यदेव कापसे, कोल्हापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील करूंडवाडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र केशेगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगा मुधोळकर यांनी संगनमत करून तपासणी दौऱ्याच्या वाहनभाडे, निवास व भोजन या नावाखाली बनावट पावत्या सादर करून हजारो रुपयांचा अपहार केला.

विशेष म्हणजे केशेगाव–नागपूर असा शेकडो किलोमीटरचा परतीचा प्रवास ट्रॅक्टरने केला, असे रसिदीत दाखवण्यात आले असून या नोंदीवरूनच गैरव्यवहाराचा संशय आणखी दृढ झाला आहे.

ट्रॅक्टरचा MH 24 D 4011 हा नंबर लातूर जिल्ह्यातील असूनही नागपूरच्या ‘ओंकार मल्टीसर्व्हिसेस’ या परिवहनदाराकडून 6,875 रुपयांचे वाहनभाडे बिल सादर करण्यात आले.
“तपासणी करायला डॉक्टरांचे पथक आले… आणि तपासणी करून ट्रॅक्टरने नागपूरला परत गेले म्हणे! ही तर थेट जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे,” असा आरोप तक्रारदाराने केला.

तक्रारीत असेही नमूद आहे की—

  • निवास–भोजनासाठी 9,224 रुपये,
  • डॉ. कापसे यांच्या खात्यात 13,875 रुपये,
  • तर डॉ. करूंडवाडे यांच्या खात्यात 7,754 रुपये जमा झाले.

ही सर्व बिले कृत्रिमरीत्या तयार करण्यात आली असून या प्रक्रियेत डॉ. गंगा मुधोळकर यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप आहे.

लांबचा नागपूरचा प्रवास परतीसाठी ट्रॅक्टर दाखवणे, त्यासाठी खाजगी सेवा पुरवठादाराचे पावतीपत्र जोडणे, आणि खर्चाचे फुगवलेले आकडे — या सर्वामुळे संपूर्ण व्यवहार अत्यंत संशयास्पद असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. “हा प्रकार केवळ बनावट पावत्यांपुरता मर्यादित नसून आरोग्य विभागातील आणखी मोठ्या आर्थिक अनियमिततांची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र केशेगावचे लेखापरीक्षण करून सर्व व्यवहारांची चौकशी व्हावी,” अशी मागणीही खंडागळे यांनी केली आहे.

या गंभीर आरोपांबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एल. हरिदास यांना विचारले असता त्यांनी दैनिक जनमतशी बोलताना,
“तक्रार प्राप्त झाली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल,”
अशी अधिकृत प्रतिक्रिया दिली.

धाराशिव नगरपालिकेसाठी भाजपकडे 16 जणांनी दिल्या मुलाखती

धाराशिव – जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली असून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार कोण आहेत याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

महायुतीतील बिग ब्रदर असणाऱ्या भाजपकडून १६ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे लक्ष लागले आहे.

मुलाखती दिलेल्या उमेदवार

१) नेहा राहुल काकडे

२) सुवर्णा खंडेराव चौरे

३)छाया पांडुरंग लाटे

४)शिवानी राजेंद्र परदेशी

५)राजकन्या अडसूळ पवार

६) ॲड. अंजली पांडुरंग कोरे

७) मीनाक्षी संभाजी धत्तुरे

८) वर्षा युवराज नळे

९)रुक्मिणी पिराजी मंजुळे

१०)ज्योती भोई मुंडे

११)शर्मिला संभाजी सलगर

१२) डॉ. अश्विनी चंद्रकांत मुंडे

१३) डॉ. शैलजा सुधीर कुलकर्णी

१४) पूर्वा अक्षय ढोबळे

१५) मंजुषा विशाल साखरे

१६)वंदना अमित शिंदे

महाविकास आघाडी आणि इतर पक्ष कोणते उमेदवार देतात यावरून पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषदेत खळबळ! उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांची तक्रार

ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांचा आरोप — “हुकूमशाही वागणूक, मानसिक छळ सहनशक्तीच्या पलीकडे”

धाराशिव : जिल्हा परिषद धाराशिवच्या ग्रामपंचायत विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अनंत कुंभार यांच्या विरोधात गंभीर तक्रार करत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कुंभार साहेब हे कार्यालयीन कामकाजात सतत हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांशी हुकुमशाही पद्धतीने वागतात. घरातील नोकरासारखे बोलतात, आरेरावी शब्द वापरतात आणि अभ्यागतांसमोरही अपमानास्पद भाष्य करतात.”

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, कामकाज योग्य पद्धतीने पूर्ण केले तरी संचिका वारंवार परत केली जाते. “काम येत नसेल तर नौकरी सोडा”, “गुरेराखे तुमच्यापेक्षा चांगले काम करतात” अशा अवमानकारक शब्दांचा वापर केला जातो, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

“आम्ही शासन नियमांनुसार ईमानीने काम करत आहोत, मात्र सततचा अपमान, धमक्या आणि ओरडामुळे मानसिक ताण निर्माण झाला आहे. श्री. कुंभार साहेबांच्या हुकुमशाहीतून मुक्त करून न्याय मिळावा,” अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान ग्रामसेवक संघटना आणि विस्तार अधिकारी संघटना यांचे आज सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत भेटले असून त्यांच्याकडे देखील सर्वांनी ही कैफियत मांडली.

या तक्रारीमुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदोलनाची स्टंटबाजी, कालच तयार होते पत्र तरीही आज आंदोलनाचा हट्ट !पहिल्याच दिवशी संपले महिलांचे साखळी उपोषण

धाराशिव –
29 ऑक्टोबर रोजी तयार असलेल्या पत्रावर आज 140 कोटींच्या स्थगितीविरोधात असलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याने हे आंदोलन होते की स्टंट असा प्रश्न निर्माण झाला असून धाराशिव शहरवासीयांच्या जखमेवर मीठ टाकण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
140 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाला स्थगिती मिळाल्यानंतर शहरात आंदोलनाची धग पहायला मिळाली मात्र भाजपाच्या इच्छुकांनी धाराशिव कृती समितीच्या बॅनरखाली एकत्र येत साखळी उपोषण केले आणि एका दिवसात ते सुटले देखील.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या संबंधित महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता मात्र 18 महिने काम का थांबले? या काळात आंदोलन का केले नाही अशा प्रश्नांना त्या उत्तरे देऊ शकल्या नाहीत. तसेच धाराशिव कृती समिती कधी स्थापन झाली त्या समितीचे पदाधिकारी कोण आहेत याबाबत देखील त्या उत्तर देऊ शकल्या नाहीत.

म्हणे विरोधकांनी दिली कामाला स्थगिती!

140 कोटींच्या कामाला विरोधकांनी स्थगिती दिल्याचा अजब आणि हास्यास्पद दावा उपस्थित महिलांनी केला. रस्त्याची कामे झाली पाहिजेत ही मुख्य मागणी त्यांची होती. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे देण्याचे टाळले.

त्या व्हायरल मेसेजचा इन्कार

आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला गर्दी जमविण्यासाठी भाजपाच्या वतीने इच्छुक उमेदवार महिलांना उपस्थित राहण्याचे आणि सोबत महिला आणण्याचे टार्गेट देण्यात आल्याचे मेसेज व्हॉटसॲप द्वारे देण्यात आले होते असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते याबाबत भाजप शहराध्यक्ष अमित शिंदे यांना विचारले असता त्यांनी असा मेसेज दिला नसल्याचे सांगितले. तसेच कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असल्याचे सांगितले.

29 तारखेच्या पत्रावर 30 तारखेला आंदोलन सोडले

कृती समितीच्या वतीने जे आंदोलन करण्यात आले होते ते उपोषण सोडताना जे पत्र प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे ते कालचे म्हणजे 29 ऑक्टोबर रोजी तयार करण्यात आले होते. मात्र 29 तारखेच्या पत्रावर 30 तारखेला आंदोलन संपवणे हा अजब प्रकार पाहायला मिळाला.

महाविकास आघाडीचे देखील आंदोलन

महाविकास आघाडीच्या वतीने देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करत आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत 140 कोटीच्या कामांना दिलेल्या स्थगितीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते महाविकास आघाडी आणि भाजप पुरस्कृत आंदोलनकर्ते एकाच ठिकाणी एकत्र आल्याने काही काळ तणावाची वातावरण होते

उल्फा/दुधना नदीवरील पुल धोकादायक! लोखंडी कठडे महापुरात वाहून गेले, अपघात होण्याची शक्यता

अपघात झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग जागे होणार का?

परंडा, दि. २९ ऑक्टोबर – आवार पिपरी येथील उल्फा/दुधना नदीवरील पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे महापुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पुल अत्यंत धोकादायक बनला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र “अपघात होण्याची वाट पाहत आहे का?” असा प्रश्न प्रवासी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

२२ सप्टेंबर रोजी उल्फा/दुधना नदीला आलेल्या महापुरात आवार पिपरी येथील पुलाचे दोन्ही बाजूंचे लोखंडी कठडे पाण्याच्या तडाख्यात वाहून गेले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तब्बल एक महिना उलटूनही पुलाच्या संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीचे कोणतेही काम सुरू केलेले नाही. पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहने आणि दुचाकी जात असताना कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, ज्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे त्या कामांकडेच सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. अधिकारी आणि कर्मचारी नेमक्या कोणत्या कामात व्यस्त असतात, हा प्रश्नही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

परंडा–कुर्डूवाडी राज्य मार्ग हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावरून दररोज शेकडो प्रवासी आणि वाहने मुंबई, पुणे, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी शहरांकडे प्रवास करतात. या रहदारीच्या मार्गावर आवार पिपरी येथील उल्फा/दुधना नदीवरील धोकादायक पुल अपघातास निमंत्रण देत आहे.

या धोकादायक पुलाच्या लोखंडी संरक्षक कठड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

सोन्नेवाडीतील अकरा वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू

गिरवली, दि. २९ (प्रतिनिधी) – भुम तालुक्यातील सोन्नेवाडी येथील अकरा वर्षीय मुलाचा मंगळवारी (दि. २८) दुपारी तलावात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे सोमवारी (दि. २७) रोजी त्याचा वाढदिवस साजरा झाला होता. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे सोन्नेवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोन्नेवाडी येथील शंभू दत्तात्रय सोन्ने हा पाचवीत शिकत होता. मंगळवारी तो आपल्या आजोबा आणि लहान भावासोबत जनावरे चारण्यासाठी सोन्नेवाडी शिवारात गेला होता. गिरवली फाटा–सोन्नेवाडी रोडलगत एक तलाव आहे. जनावरे चरत असताना शंभूने आजोबांना सांगितले की, “मी जनावरांना पाणी पाजून येतो,” असे म्हणून तो आपल्या लहान भावाला घेऊन तलावाकडे गेला.

लहान भाऊ पाण्याच्या बाहेर थांबला, पण शंभू बराच वेळ परतला नाही. त्यामुळे भावाने आजोबांना ही माहिती दिली. आजोबा तलावावर गेले असता त्यांना शंभूचे कपडे दिसले, मात्र तो दिसत नव्हता. त्यांनी तत्काळ गावातील तरुणांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. अखेर शंभूचा मृतदेह तलावात आढळून आला.

वाशी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ईट येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर सोन्नेवाडी येथे त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

या दुर्दैवी घटनेमुळे सोन्नेवाडी व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कामांना स्थगिती मिळाली, यात विरोधकांना ‘आसुरी आनंद’ – भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे

रस्ते विकासासाठी मंजूर १४० कोटींच्या निधीवरून धाराशिव राजकारण तापले

धाराशिव :
धाराशिव शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी मंजूर झालेल्या १४० कोटी रुपयांच्या कामांना तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल  काकडे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, “शहराच्या विकासाच्या कामांना स्थगिती मिळाल्यानंतर काही मंडळींनी जणू आसुरी आनंद व्यक्त केला आहे. शहराच्या प्रगतीपेक्षा राजकारण त्यांना अधिक प्रिय वाटते,” असे काकडे म्हणाले.

महायुती सरकारच्या काळात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून  तुळजापूर, नळदुर्ग आणि कळंब या भागांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला धाराशिव साठी  तब्बल १४० कोटी रुपयांचा रस्ते विकास निधी मंजूर झाला होता. काही दिवसांपूर्वी या कामाचा कार्यारंभ आदेश निर्गमित झाल्याची घोषणा राणादादांनी पत्रकार परिषदेत केली होती. शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांमध्ये या निर्णयामुळे आशेचा किरण निर्माण झाला होता.

मात्र, त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या कामावर SIT चौकशीची मागणी केली आणि लगेचच कामांना स्थगिती मिळाल्याची बातमी समोर आली. या निर्णयानंतर शहरातील विरोधी गटांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत बातम्या शेअर केल्या, यावर युवा मोर्चाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काकडे म्हणाले, “धाराशिवच्या विकासासाठी मंजूर झालेल्या निधीवर काही जण राजकारण करत आहेत. शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हे लोक विकासाला अडथळा ठरत आहेत. पण आमदार राणादादा सर्व अडचणींवर मात करून हे काम निश्चित पूर्ण करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोटारसायकल चोर टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात – चार चोरीच्या मोटारसायकलींसह दोन आरोपी पकडले

धाराशिव, दि. २८ ऑक्टोबर : प्रतिनिधी

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण कामगिरी करत चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, दोन संशयित इसमांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाला धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्याच्या मोहिमेत असताना, कळंब येथे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी आणले आहेत. प्राप्त माहितीनुसार पथकाने तत्काळ सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी चोरी केलेल्य मोटारसायकलींची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यावरून पथकाने त्यांच्या ताब्यातून एकूण चार मोटारसायकली जप्त केल्या.

गुन्हे शाखेने तपास करताना या मोटारसायकली आनंदनगर, तुळजापूर, येरमाळा (धाराशिव जिल्हा) आणि मुरुड (लातूर जिल्हा) या ठिकाणांहून चोरीस गेल्या असल्याचे उघड झाले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
1️⃣ अर्जुन साहेबराव काळे (वय २९ वर्षे, रा. वाकडी पारधी पिढी, ता. कळंब, जि. धाराशिव)
2️⃣ नितीन विश्वास शिंदे (वय २५ वर्षे, रा. नांदूर, ता. केज, जि. बीड, ह.मु. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव).

दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, तसेच शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पारा येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून हडप केलेली रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

बाजीराव उद्धव भराटे यांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याला अखेर यश

वाशी (राहुल शेळके): वाशी तालुक्यातील सर्वात मोठी, सतत चर्चेत असणारी आणि वादग्रस्त ग्रामपंचायत — पारा ग्रामपंचायत — येथील भ्रष्टाचार अखेर उघड झाला आहे. राजकीय वरदहस्तामुळे सतत कारवाईतून बचावत आलेले सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण देशमुख यांना अखेर शासन खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर (भाप्रसे), छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशामुळे वाशी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, तालुक्यातील ज्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी अपहार केलेला आहे, त्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील पारा येथील वादी बाजीराव उद्धव भराटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांनी चौकशी केली असता खालीलप्रमाणे अनियमितता आढळून आली:

  • वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेची रक्कम रुपये 2,33,000/-
  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजना रक्कम रुपये 60,000/-
  • ग्रामनिधी खात्यावरील रक्कम रुपये 43,000/-
    अशा प्रकारे एकूण रुपये 3,36,000/- इतकी रक्कम सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अनियमित पद्धतीने वापरल्याचे दिसून आले.

सदर दोघांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहितेमधील वित्तीय नियमांचे उल्लंघन केले असून, विकास कामे व साहित्य खरेदी करताना शासनाने ठरविलेल्या प्रक्रिया आणि गुणवत्ता तपासणीचे नियम पाळले नाहीत. देयकांमधील शासकीय कपातीसंदर्भातही आवश्यक कार्यवाही झाल्याचे नोंदीत दिसून आले नाही. त्यामुळे सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद आणि ग्रामविकास अधिकारी हे प्रथमदर्शनी जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे सरपंच राजेंद्र काशीद यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) नुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली. या संदर्भातील सुनावण्या दि. 6/1/24, दि. 11/12/24, आणि दि. 13/5/25 रोजी घेण्यात आल्या. त्या वेळी प्रशासनाच्या वतीने पंचायत समिती वाशीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बी. एस. राठोड, विस्तार अधिकारी (पं.) व्ही. बी. रूपवट, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी पी. बी. देशमुख, आणि कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी ए. बी. शेख उपस्थित होते.

पुढील सुनावणीच्या तारखा 24/6/25, 15/7/25, 29/7/25, आणि 12/8/25 रोजी ठरवण्यात आल्या होत्या. अखेर दि. 30/9/25 रोजी खालीलप्रमाणे निर्णय देण्यात आला:

  1. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांचा अहवाल (जा. क्र. जि. प. धा./सा. प्र. वि./2/ग्रा. प. वि.8/सीआर-ई-855774/कावि/56/2024, दि. 28/1/2025) मान्य करण्यात येतो.
  2. गैरअर्जदार राजेंद्र पांडुरंग काशीद, सरपंच, ग्रामपंचायत पारा, ता. वाशी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) नुसार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात येत आहे.
  3. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी चौकशी अहवालाच्या अनुषंगाने अपहारित रक्कम निश्चित करण्यासाठी विशेष समिती गठित करून ती शासन खात्यात जमा करण्याची कार्यवाही करावी. तसेच रक्कम वसूल न झाल्यास संबंधितांच्या मालमत्तेवर (उदा. 7/12 नोंदणीवर) अपहारित रकमेचा बोजा टाकण्याची कार्यवाही करावी.

असे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर (भाप्रसे), छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी दिले आहेत. आता या आदेशाची अंमलबजावणी करून सरपंच राजेंद्र काशीद यांच्या कडील अपहारित रक्कम कशी आणि किती दिवसात वसूल केली जाते, तसेच ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव कोणती कार्यवाही करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.