Home Blog Page 5

तुळजापूरमध्ये बनावट खत निर्मितीवर कृषि विभागाची धडक कारवाई

‘तेरणा व्हॅली फर्टिलायझर अँण्ड केमिकल’चा परवाना निलंबित

धाराशिव, दि. ८ ऑक्टोबर – शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कृषी विभाग सतत निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांवर लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे “तेरणा व्हॅली फर्टिलायझर अँण्ड केमिकल” नावाने सुरू असलेल्या बनावट खतनिर्मिती कारखान्यावर जिल्हास्तरीय भरारी पथकाने धडक तपासणी करून गंभीर अनियमितता उघडकीस आणली.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर यांच्या आदेशानुसार भरारी पथक प्रमुख कृषी विकास अधिकारी एन.एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रविण पाटील, व्ही.एम. भुतेकर, डी.व्ही.ुळे, आबासाहेब देशमुख, दीपक गरगडे आणि जी.पी. बनसोडे यांनी ही कारवाई केली. तपासणीनंतर सविस्तर अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला.

या अहवालाच्या आधारे कृषि आयुक्तालयातील परवाना अधिकारी तथा कृषि संचालक (नि.व.गु.नि.) यांनी सुनावणी घेऊन “तेरणा व्हॅली फर्टिलायझर अँण्ड केमिकल” या कंपनीचा खत निर्मिती व विक्री परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला आहे.

अशा प्रकारच्या बनावट खतनिर्मिती आणि बेकायदेशीर विक्रीविरोधात विभागाची तपासणी पुढेही सुरू राहणार असून दोषी आढळल्यास बियाणे, खते आणि कीटकनाशके (नियंत्रण) कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

शेतकऱ्यांना आवाहन करताना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले की, खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना नेहमी परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच खरेदी करावी. खरेदीवेळी पक्की पावती व ई-पॉस मशीनचे बिल घ्यावे, तसेच खताच्या बॅगवरील किंमतीशी ताळमेळ तपासावा.

बियाण्यांच्या पिशव्या सिलबंद असल्याची खात्री करावी आणि त्यावरील अंतिम मुदत पाहावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे टॅग, पिशवी व नमुना हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवावा.

शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणाऱ्या कोणत्याही बनावट किंवा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे प्रभारी अधिक्षक कृषी अधिकारी एम.के. आसलकर यांनी स्पष्ट केले.

लिंगायत समाजाचा 27 वा महामोर्चा 7 डिसेंबरला धाराशिवमध्ये; अल्पसंख्याक दर्जा आणि स्वतंत्र धर्म मान्यतेची मागणी

धाराशिव (प्रतिनिधी) –
लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी आतापर्यंत 26 मोर्चे काढल्यानंतर आता 27 वा ऐतिहासिक महामोर्चा येत्या 7 डिसेंबर रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. या महामोर्चात कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधील सुमारे पाच लाख बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

धाराशिव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लिंगायत समन्वय समितीचे पदाधिकारी आणि अविनाश भोसीकर उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, हा महामोर्चा लिंगायत समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली होणार असून लिंगायत समाजातील 68 संघटना या समितीच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत.

समाजाच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
1️⃣ संविधानिक नोंद घेऊन लिंगायत समाजाला अल्पसंख्याक म्हणून जाहीर करावे.
2️⃣ स्वतंत्र लिंगायत धर्माला अधिकृत मान्यता द्यावी.
3️⃣ संत श्री बसवेश्वर यांचे स्मारक मंगळवेढा येथे उभारावे.

यावेळी हेही सांगण्यात आले की, येणाऱ्या जनगणनेत लिंगायत धर्माबाबत चुकीची माहिती दिली जात आहे, त्याला समाजाकडून तीव्र विरोध केला जाणार आहे.

मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (बाळासाहेब आंबेडकर) उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे या महामोर्चाला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

लिंगायत समन्वय समितीने समाजातील सर्व घटकांना या ऐतिहासिक महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

वृक्षतोडीमुळे केशेगावचे सरपंच अपात्र: विभागीय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

धाराशिव, धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत गुणवंत पाटील यांना अवैध वृक्षतोडीप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ (१) अंतर्गत अपात्र घोषित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर जितेंद्र पापळकर यांनी हा निकाल जाहीर केला असून, सरपंचांना त्यांच्या सध्याच्या कार्यकाळासाठी पदावरून दूर करण्यात आले आहे. या प्रकरणात सरपंचांनी अतिक्रमणाची खात्री न करता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील झाडे तोडल्याचा आरोप सिद्ध झाला असून, त्यांनी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे दंड भरल्याचेही निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव गावातील रहिवासी रविंद्र हरी शिंदे यांच्या तक्रारीने झाली. शिंदे यांनी सरपंच अभिजीत पाटील यांच्याविरुद्ध विभागीय आयुक्तांच्या न्यायालयात अपील क्रमांक २६६/२०२४ दाखल केले होते. शिंदे हे अपंग नागरिक असून, त्यांनी आरोप केला की, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी २०२२-२३ मध्ये निवडून आल्यानंतर पदाचा गैरवापर करून त्यांच्या बहिणीच्या नावे असलेल्या गट क्रमांक १७२ मधील (क्षेत्र ८० आर) शेतजमिनीवरील बोरवेल, घर, पिठाची गिरणी, किराणा दुकानाचे पत्र्याचे शेड, १३ झाडे आणि पीव्हीसी पाईप जेसीबीच्या साहाय्याने २१ जानेवारी २०२४ रोजी उद्ध्वस्त केले. हे सर्व केशेगाव ते उमरेगव्हाण डांबरी रस्त्यालगत दक्षिण दिशेला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच, सरपंचांनी त्यांच्या शारीरिक व्यंगावर भाष्य करून हुकुमशाही पद्धतीने हे कृत्य केल्याचा आरोपही केला. याउलट, सरपंचांनी स्वतः रस्त्यालगत गाळे बांधून अतिक्रमण केल्याचा दावा शिंदे यांनी केला.

शिंदे यांनी या नुकसानीची भरपाई मागत जिल्हाधिकाऱ्यांकडे २३ जानेवारी २०२४ रोजी तक्रार केली आणि ५ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकशाही दिनातही अर्ज सादर केला. त्यांनी संबंधित दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून पदावरून हटवण्याची मागणी केली. मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार धाराशिव यांच्याकडून १ फेब्रुवारी २०२४ रोजी पंचनामा करून अहवाल सादर केला, ज्यात शेड आणि झाडे गट क्रमांक १७२ मध्ये किंवा रस्त्यालगत असल्याचे सांगण्यात आले, परंतु मोजणीशिवाय अतिक्रमणाची निश्चिती होणार नाही असे नमूद केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), जिल्हा परिषद धाराशिव यांनी या प्रकरणी प्रस्ताव क्रमांक जाक्र/जिपउ/साप्रवि/ग्रापवि-८/सीआरई-९९१६१८/कावि/९२८/२०२४ दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी विभागीय आयुक्तांकडे परवानगीसाठी सादर केला. यात सरपंचांनी अतिक्रमणाची खात्री न करता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील अतिक्रमण काढून कर्तव्यात कसूर केल्याचे नमूद होते. विभागीय आयुक्तांनी १३ जानेवारी २०२५ रोजी सीईओंना विहित चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

सीईओंनी ४ मार्च २०२५ रोजी सुनावणी घेतली आणि ९ एप्रिल २०२५ रोजी अहवाल क्रमांक जिपधा/साप्रवि/२/ग्रापवि-८/सीआर-ई-९९१६१८/कावि/२५६/२०२५ सादर केला. या अहवालात नमूद केले की, सरपंच प्रथमदर्शनी वृक्षतोडीस जबाबदार असून, त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी तुळजापूर यांच्याकडे अवैध वृक्षतोडीसाठी अनामत रक्कम भरली आहे. मात्र, विवादित मालमत्तेची मालकी शिंदे यांनी सिद्ध केलेली नाही, अतिक्रमणाची स्थिती निर्विवाद नाही आणि गट क्रमांक १७२ चे मूळ भोगवटादार शिंदे नसल्याचेही सांगण्यात आले. तसेच, नुकसानीची चौकशी या प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात येत नाही असेही नमूद केले.

विभागीय आयुक्तांच्या न्यायालयात या अहवालानंतर ८ जुलै २०२५ रोजी सुनावणी ठेवली गेली. यात शिंदे आणि त्यांचे वकील ॲड. विजय बी. जोगदंड उपस्थित होते, तर सरपंच अभिजीत पाटील उपस्थित राहिले. प्रशासनाकडून पंचायत समिती धाराशिवचे विस्तार अधिकारी (पं) एस.एम. ढाकणे आणि ग्रामपंचायत अधिकारी व्ही.के. चौगुले हजर होते. सुनावणी पुढे २२ जुलै २०२५ पर्यंत ढकलली गेली. २२ जुलैला शिंदे आणि त्यांचे वकील, सरपंच आणि त्यांचे वकील ॲड. प्रसाद जोशी (पी.एम. जोशी म्हणून सुरुवातीला उल्लेख), तसेच ग्रामपंचायत अधिकारी बी.के. चौगुले उपस्थित होते. सुनावणी पुढे ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ढकलली, परंतु ती कार्यबाहुल्यामुळे होऊ शकली नाही.

अखेर १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुनावणी झाली. यात शिंदे यांनी त्यांचे वकील ॲड. जोगदंड यांच्यामार्फत लेखी म्हणणे सादर केले. त्यांनी सरपंचांनी पदाचा गैरवापर केल्याचे सांगून, विना परवाना झाडे तोडल्यामुळे ते दोषी असल्याचे आणि वन अधिकाऱ्यांकडे १०,००० रुपये दंड भरल्याचे नमूद केले. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना अपात्र करण्याची मागणी केली.

सरपंचांच्या वकील ॲड. प्रसाद जोशी यांनी लेखी म्हणणे सादर करून अर्ज खोटा आणि द्वेषपूर्ण असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सरपंचांनी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, ग्रामपंचायतीचे नुकसान झाले नाही. रस्त्यालगतच्या झाडांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार आणि एक ट्रॅक्टर अपघातानंतर झाड रस्त्यावर पडल्याने ते बाजूला केले. तसेच, शिंदे यांनी सादर केलेल्या मालमत्तेची नोंद ७/१२ उताऱ्यात नसल्याचे सांगितले. सीईओंचा अहवाल अमान्य करण्याची मागणी केली.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, प्रशासनाचे अहवाल आणि पुरावे विचारात घेऊन विभागीय आयुक्तांनी निकाल राखीव ठेवला आणि १० सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केला. निकालात नमूद केले की, सरपंच प्रथमदर्शनी वृक्षतोडीस जबाबदार असून, दंड भरल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, मालमत्तेची मालकी आणि अतिक्रमण सिद्ध झालेले नाही, तसेच मूळ भोगवटादार शिंदे नसल्याचेही कबूल केले. तरीही, सीईओंचा अहवाल मान्य करून सरपंचांना कलम ३९ (१) अंतर्गत अपात्र घोषित केले. प्रकरण बंद करून संचिका अभिलेखात वर्ग करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथे ॲड. जोगदंड पाटील यांनी आणि धाराशिव येथे ॲड. प्रशांत माने यांनी शिंदे यांच्या बाजूने काम पाहिले.

धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी मोडली शासकीय निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकांतच ठेवण्याच्या धोरणाची चौकट

स्थानिक स्वराज्य संस्थांचा चौदा कोटींचा निधी खाजगी बँकेत हलविण्याचे आदेश

धाराशिव (आकाश नरोटे)– शासनाने दिलेला निधी कुठे वापरायचा आणि कुठे ठेवायचा याबाबत स्पष्ट धोरण ठरवून दिलेले असताना, धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी या धोरणाची चौकट मोडत खाजगी बँकेत निधी ठेवण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया, सांजा रोड शाखेत खाते असून त्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा तब्बल १४ कोटी ५२ लाख ७० हजार इतका निधी शिल्लक होता. मात्र, हा प्रचंड निधी कोटक महिंद्रा बँकेत वर्ग करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्याचे उघड झाले आहे.

राज्य शासनाने १ एप्रिल २०२० पासून लागू केलेल्या आदेशानुसार, सर्व शासकीय कार्यालयांनी आपले बँक व्यवहार केवळ राष्ट्रीयकृत बँकांमार्फतच करणे बंधनकारक आहे. खाजगी बँकांमध्ये खाती न उघडण्याचे तसेच विद्यमान खाती बंद करण्याचे आदेश सरकारने स्पष्टपणे निर्गमित केलेले असताना, जिल्हाधिकाऱ्यांनीच शासन निर्णयाला धाब्यावर बसवून खाजगी बँकेत खाते उघडणे आणि निधी हलविण्याचा आदेश देणे हे आश्चर्यकारक आणि संशयास्पद मानले जात आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तर निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्याशी विचारणा केली असता हे पत्र नियोजन विभागाकडील असल्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, शासन निर्णय मोडणाऱ्या या कारवाईची चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. खाजगी बँकांकडून मोठ्या प्रमाणात सी एस आर निधी मिळवण्यासाठी हा खटाटोप असू शकतो किंवा खाजगी बँकांनी प्रशासनाला कुठले प्रलोभन दिले आहे का याबाबत आता उलटसुलट चर्चा होताना दिसत आहेत.

46 लाखाच्या पी आर पुढे नोकरशाही जिंकली, धाराशिवकर हरले !

धाराशिव – नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडलेल्या धाराशिव मध्ये सध्या भाटगिरी जोरात सुरू असून 46 लाखाच्या पी आर पुढे नोकरशाही जिंकली असून धाराशिवकर हरले आहेत.

गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांचा त्यांनीच आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. नाचायला, आनंदात सहभागी व्हायला कोणाचा विरोध नसतो मात्र जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना, जीवितहानी, वित्तहानी होत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी मंदिराचे प्रमुख म्हणून सहभागी होणे अपेक्षित होते मात्र कलाकारांच्या आग्रहाला हो म्हणत त्यांनी ठेका धरला आणि तो व्हिडिओ त्यांच्या पी आर टीम ने व्हायरल केला.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे पत्र निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी टाकले होते मात्र त्याला बुड ना शेंडा म्हणजेच अधिकृत लेटरपॅड आणि स्वाक्षरी नव्हती.

या प्रकरणाची पुन्हा चर्चा का?

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना नको ते बोल सुनावले होते मात्र त्याच व्यक्तीने त्यांची आज भेट घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांबद्दल गैरसमज झाला होता आणि धाराशिवमधून त्यांना दोन तीन लोकांनी फोन करून जिल्हाधिकारी तसे नाहीत असे सांगितले त्यामुळे त्यांची भेट घेतल्याचे सांगितले. पी आर टीमच्या व्यक्तीने फोन करून भेटीचा समन्वय घडवून आणल्याची चर्चा यानिमित्ताने झाली सोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हिडिओचे शांत झालेले प्रकरण पुन्हा चर्चेत आले.

आंदोलनाचा आर डी सी पॅटर्न

अधिकाऱ्यांवर एखादी गोष्ट शेकली की महसूल संघटनांना पुढे करून प्रशासनावर दबाव आणण्याचा आर डी सी पॅटर्न गेल्या काही महिन्यात रुजू झाला आहे. यात महसूल कर्मचाऱ्यांची इच्छा असो की नसो कर्मचाऱ्यांनी अधिकारी ज्या निवेदनावर सांगतात त्या निवेदनावर निमुटपणे स्वाक्षरी करायची असा दंडक आहे. तोच आर डी सी पॅटर्न आज दिसून आला नव्या पडलेल्या प्रथेप्रमाणे महसूल कर्मचाऱ्यांनी कळ्या फिती लावून आंदोलन केले देखील.

पी आर टीमच्या साथीला लाभार्थी गँग

कथित पी आर टीम जिल्हाधिकाऱ्यांची बाजू जोरदारपणे लावून धरत आहे मात्र त्यांना साथ मिळाली ती जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या विविध समित्यांवर असणाऱ्या याच अशासकीय सदस्यांनी जिल्हाधिकारी किती चांगले आहेत याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरवल्या. मात्र या अशासकीय सदस्यांची अनेक कामे गेल्या अनेक महिन्यापासून पेंडींग असून अडचणीत आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना खुश करून पदरी काही पडते आहे का हे पाहीले जात आहे.

धाराशिवकर हरले कुठे?

जिल्हाधिकाऱ्यांची जिल्ह्यात कुठे शेती नाही त्यांचा कोणाच्या बांधला बांध नाही मात्र तुळजाभवानी मंदिराचे 2 जनसंपर्क अधिकारी त्यांच्या साथीला 3 सहायक जनसंपर्क अधिकारी असताना आणि माहिती जनसंपर्क विभागाचे जिल्हा माहिती कार्यालय श्री तुळजाभवानी मंदिराचा प्रचार प्रसार करत असताना 46 लाख खर्च करून प्रसिद्धीचे टेंडर का काढावे लागले आणि टेंडर काढले नसेल तर आम्ही टेंडर काढले नाही अशी भूमिका प्रशासन घेताना का दिसत नाही. पावसाळ्याच्या दिवसात जवळपास 8 ते 9 कोटी खर्च करून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा नेमका घाट कोणी घातला हे विचारायला सामान्य धाराशिवकर कमी पडले आणि तेथेच हरले.

आम्ही प्रशासनाच्या सोबतच

जिल्ह्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नेहमी सोबतच आहेत यापुढेही राहतील मात्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातात प्रशासनाचा कारभार दिला जात असेल तर त्याला विरोध होणे किंबहुना तो जनतेसमोर आणणे गरजेचे आहे.

४६ लाखाच्या टेंडरवर कोण बोलणार?

पी आर टीमचे 46 लाखाचे टेंडर आहे. त्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पारदर्शक माहिती माध्यमांच्या समोर आणून दूध का दूध पाणी का पाणी करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आकाश महादेव नरोटे

कार्यकारी संपादक

दैनिक जनमत

पेड पीआरओ टीम ने केलेला अन् अंगलट आलेला कार्यक्रम ,आधी शेतकरी वाचवा नंतर खुर्ची

जिल्हाधिकारी हे केवळ पद नसून ती एक जबाबदारी आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा देवीच्या गाण्यावर ठेका धरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् गोंधळ उडाला त्याला कारण होते जिल्हाभरात शेतीचे, शेतकऱ्यांचे, पशुपालकांचे झालेले नुकसान. एकीकडे माय बाप शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन ठेका धरतात ही चिड आणणारी गोष्ट आहे. राज्यभरातून या घटनेवर टिका टिपण्णी झाली पडसाद उमटले. अमोल जाधव या शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले तिथे पोलिसांनी केलेली बाचाबाची महाराष्ट्राने पाहिली. त्याच्या काही वेळानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा दिलगिरी व्यक्त केलेला संदेश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. दिलगिरी व्यक्त करताना पुन्हा जो दिलदारपणा हवा होता तो मात्र दिसला नाही कुठल्याही अधिकृत लेटरपॅड किंवा साधी सही नसलेला मजकूर अधिकृत मानावा की अनधिकृत हा प्रश्न त्यातून निर्माण होतो. पण हे झाले कशामुळे याचे मूळ कुठे आहे हा प्रश्न अजून अनुत्तरित होता त्याचे मूळ आहे प्रसिद्धित. तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे कव्हरेज करण्यासाठी एक पी आर ओ टीम नेमल्याची चर्चा आहे त्या पी आर ओ टीम ने जिल्हाधिकाऱ्यांची प्रसिद्धी करण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता मात्र प्रकरण अंगलट आले. पत्रकारितेचा अनुभव नसताना राजकीय लोकांच्या टोळीत राहिलेल्यांना प्रसिद्धीचे काम दिले गेले की अशी बोंब होते हे जगातील सर्वात अवघड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना कोण समजावून सांगणार? विशेष म्हणजे त्याच पी आर ओ टीम ने तो व्हिडिओ हटवून टाकला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात इतर माध्यमे चालवत असलेली पोस्ट टाकली.

जिल्हाधिकारी आणि प्रशासन पूर,नुकसान या आपत्तीमध्ये काम करत आहे का तर याचे उत्तर हो आहे. मात्र प्रसिद्धीच्या नादात अप्रत्यक्षपणे झालेला हा प्रकार त्यातून प्रशासनाची झालेली बदनामी, चांगल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यावर ही वेळ कशामुळे आली याचे चिंतन कोण करणार?

जिल्हाधिकारी त्यांचे करत असलेले काम याबाबत पुन्हा सोशल मीडियातून बाजू लावून धरण्याचा प्रयत्न होत आहे ते किती चांगले काम करत आहेत याबद्दलच्या पोस्ट फिरवल्या जात आहेत. एक लोकसेवक म्हणून त्यांची जबाबदारी ते योग्यरित्या पार पाडत आहेत आपत्ती आणि उत्सव यातील समतोल राखताना अशी गडबड होऊ शकते हे मान्य मात्र तुळजाभवानी देवी आणि तुळजापूरच्या सकारात्मक बातम्या धाराशिव जिल्ह्यातील माध्यमे नेहमीच प्रसिद्ध करतात मात्र असे असताना तुळजाभवानीच्या निधीतून किंवा जिल्हा प्रशासनाच्या निधीतून पेड जनसंपर्क करावा लागतो हे खेदजनक नाही का? जिल्ह्यातील नागरिक जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन घेऊन येतात मात्र त्यांची निवेदने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारावी असा वेगळा पायंडा पाडला गेला हे लोकशाहीला धरून आहे का? जिल्हाधिकारी हे पद राजकीय नसून प्रशासनातील सेवेचे पद आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते जिल्ह्यात आलेले आहेत त्यांच्याकडून सेवा मिळावी हीच प्रामाणिक अपेक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत कोणाचे वैयक्तिक वैर नाही किंवा आकस देखील नाही मात्र जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर एकमेकांच्या हातात हात घालून चालणे अपेक्षित आहे.

हा धार्मिक कार्यक्रम नाही

ज्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरला तो कार्यक्रम पूर्वापार चालत आलेला नसून तुळजाभवानी देवीच्या नित्य कार्यक्रमाचा आणि या कार्यक्रमाचा कुठलाही संबंध नाही. मात्र या प्रकरणी सत्ताधारी राजकीय पक्षाकडून सोशल मीडियावर कँपेनिंग सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांना नव्हे तर त्या पीआरओला जो सत्ताधारी पक्षाचे काम पाहतो त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शेतीचे पंचनामे, शेतकऱ्यांना मदत आवश्यकता

या प्रकरणात थेट प्रशासनाचे प्रमुख असल्याने गेल्या दोन दिवसात प्रशासनाची काम करण्याची गती कमी झाली असून शेतकऱ्यांना जलद मदत मिळण्यासाठी सरकारने, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणे आवश्यक असून शेतकऱ्यांना फटका बसणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

प्रसिद्धीच्या टेंडरची आता तरी माहित्या द्या

तुळजाभवानी च्या नवरात्र महोत्सवाची प्रसिद्धी करण्यासाठी एक टेंडर काढल्याची चर्चा आहे मात्र पत्रकारांना याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाने अद्याप दिली नसून किमान आता तरी ही माहिती द्यायला हवी खर्च होणारा पैसा कसा खर्च होतो आहे, तरदतूद कुठून केली आहे याची माहिती सर्वसामान्यांना मिळायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आकाश नरोटे

कार्यकारी संपादक

दैनिक जनमत

सही न केलेला माफीनामा, जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न

धाराशिव – जिल्हाधिकारी व उप जिल्हाधिकारी यांचा सोशल मीडियावर नाच करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून प्रेस नोट काढण्यात आली प्रशासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत दिलगिरी व्यक्त करणारी एक प्रेस नोट जाहीर केली. मात्र या प्रेस नोटमुळेच नवीन वादळ उठले आहे. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याची यात सही नाही. ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची एव्हाना ज्या माय बाप जनतेच्या कराच्या पैशातून त्यांचे वेतन होते त्यांची दिलगिरी व्यक्त करताना खाली सही करावी वाटत नाही हे खेदजनक आहे.

समाजसेवक मनोज जाधव यांनी या प्रेस नोटवर जोरदार हल्लाबोल केला असून, “ही नोट अधिकृत आहे की दिशाभूल करण्यासाठी तयार करण्यात आली आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

जाधव म्हणाले की, या प्रेस नोटमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव नाही, जिल्हाधिकारी कार्यालयाचा लेटरपॅड नाही, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. अशा परिस्थितीत ही नोट अधिकृत मानायची कशी? प्रशासनाने ही भूमिका घेत शेतकऱ्यांची थेट दिशाभूल केली असल्याची टीका त्यांनी केली.
याचबरोबर जाधव यांनी प्रशासनास ठाम इशारा दिला की,

“तुम्ही अधिकृत प्रेस नोट जाहीर करा किंवा प्रसारमाध्यमांसमोर येऊन शेतकऱ्यांची माफी मागा. अन्यथा मी माझ्या आंदोलनावर ठाम राहीन व कोणत्याही क्षणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडेन.”
पूरग्रस्त शेतकरी आधीच संकटातून जात असताना, प्रशासनाचे हे हलगर्जीपण व चुकीची भूमिका धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.

माफी मागणे म्हणजे स्वतः केलेल्या चुकांची कबुली देऊन ती क्षमा करण्याची विनंती करणे.यात आपली चूक मान्य केली जाते आणि समोरच्या व्यक्तीकडून क्षमा मागितली जाते.
दिलगिरी व्यक्त करणे म्हणजे काही अयोग्य, दुःखद किंवा नकोसे घडले याबद्दल खंत आणि सहानुभूती व्यक्त करणे.यात नेहमीच स्वतःची चूक असतेच असे नाही; कधी कधी परिस्थितीमुळे झालेल्या त्रासाबद्दलही दिलगिरी व्यक्त केली जाते.

सध्या जिल्ह्यातील वातावरण तापले असून, प्रशासनाची कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समाजसेवक मनोज जाधव यांचा लढाऊ इशारा आता प्रशासनाला हादरवणारा ठरणार का? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून मदत व बचाव कार्याला गती देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच इतर मंत्र्यांचे दौरे होणार असल्याने प्रशासनाकडून सज्जता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद धाराशिवच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक २३ सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद व तिच्या अधिनस्त सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी २३ ते २६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुख्यालयी अनिवार्य उपस्थित राहणे आवश्यक आहे.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या परिपत्रकात स्पष्ट सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. त्यानुसार—

  • कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये.
  • अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही स्वरूपाची रजा मंजूर करण्यात येऊ नये.
  • सर्व विभाग प्रमुख व क्षेत्रीय स्तरावरील कार्यालय प्रमुख यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना सूचित करावे.
  • कोणत्याही स्तरावर झालेल्या कुचराईसाठी संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल.

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी ही पावले उचलण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान मदत व बचाव कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, यावर प्रशासनाने भर दिला आहे.

परिपत्रकात विशेषतः नमूद करण्यात आले आहे की, क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारीदेखील पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाहीत. याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखांवर टाकण्यात आली आहे.

पुरपरिस्थितीत मदत व बचाव कार्यात कोणतीही कुचराई राहू नये तसेच प्रशासनाचा वेग मंदावू नये, यासाठी जिल्हा परिषदेकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलेला हा आदेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

वाशी तालुक्यातील फक्राबाद गावात शिरले मांजरा नदी पुराचे पाणी


वाशी (प्रतिनिधी):
वाशी तालुक्यातील फक्राबाद गावचा मांजरा नदीला आलेल्या महा भयंकर पुरामुळे संपर्क तुटला असून मोबाईल द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, फक्राबाद गावातील सहा घरांत पाणी शिरले असून प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी कोणाशीही संपर्कात नाहीं. त्यामुळे फक्राबाद गावातील नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जीव मुठीत धरून हे नागरिक आपल्या कुटुंबासमवेत गावात राहत आहेत.लवकरात लवकर आम्हाला सुरक्षित स्थळी हलवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

स्वस्थ नारी सशक्त परिवार शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे संपन्न

वाशी (प्रतिनिधी):
महिला सशक्तीकरण साठी स्वस्थ नारी सशक्त परिवार या शिबिरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास सर यांच्या सूचनेप्रमाणे वाशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ महिंद्रकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 19 सप्टेंबर रोजी वाशी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार शिबीर चा शुभारंभ अंगणवाडी पर्यवेक्षिका मुरकुटे मॅडम, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ शिंदे सर, बालरोगतज्ज्ञ डॉ सूळ सर, दंतचिकित्सक डॉ देवगिरे मॅडम या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला, यावेळी नेत्र चिकित्सक श्री गायकवाड उपस्थित होते.
या शिबीर अंतर्गत महिलांचे आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी महिलांचे विविध आजार, गरोदर माता तपासणी, बालकांची तपासणी, बालकांचे लसीकरण,दातांची तपासणी, डोळयांची तपासणी, महिला व एकात्मिक बालविकास च्या माध्यमातून अंगणवाडी सेविका यांनी पोषण आहाराबाबत सर्व रुग्णांना माहिती दिली, प्रा आ केंद्र प्रयोगशाळा अंतर्गत HB, मधुमेह तपासणी व महालॅब मार्फत सिकलसेल व इतर आरोग्य तपासन्या करण्यात आल्या.
टीबी आजाराविषयी जनजागृती तसेच बेडका तपासणी करण्यात आली,आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्ड, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत मोबाईल मेडिकल व्हॅन च्या माध्यमातून एक्सरे काढण्यात आले.एकूण 210 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ शिवानी पाटील मॅडम, डॉ किलचे सर यांनी या शिबीर साठी मोलाचे परिश्रम घेतले.वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,औषध निर्माण अधिकारी, वाहन चालक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, महालॅब तंत्रज्ञ, गट प्रवर्तक, आशा कार्यकर्ती, अर्धवेळ स्त्री परिचर, पु परिचर, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य केले.