Home Blog Page 10

ताकविकी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी : शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरमागे 50 हजार रुपये मदत द्यावी

धाराशिव तालुका │ धाराशिव तालुक्यातील ताकविकी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदाच्या अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड शेती नुकसान लक्षात घेऊन हेक्टरमागे 50 हजार रुपये मदतीची मागणी केली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची विनंती सरपंच व ग्रामसेवकांकडे केली आहे.

मे महिन्यापासून ताकविकी परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने औषधोपचार, खते, बियाणे यावर खर्च केला; तरीही सततच्या पावसामुळे पिके उभे राहिले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती काहीही न लागण्याची वेळ आली आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “आम्ही कर्ज काढून शेती केली, परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिके हातची गेली. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत जाहीर करून प्रत्यक्ष मदत पोहोचवावी. अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल.”

या मागणीसाठी ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. यात शासनाकडे ठराव पाठवावा अशी विनंती करण्यात आली आहे.

या निवेदनावर जेष्ठ नागरिक नागनाथ सिंगठाकूर, बलुसिंग अरणकर, सुखसिंग बायस, महादेव यादव, प्रतापसिंग राजपूत, श्रीधर तरंगे, कोंडीबा तरंगे, सोपान यादव, जनता सिंग ठाकूर, श्रीदेवी ठाकूर, दिलीपसिंग ठाकूर, छानू ढेपे, गुलाब शेख, गणूसिंग बायस, वैभव बायस, संभाजी सूर्यवंशी, विमल सूर्यवंशी, बालाजी बायस, मारुती जाधव, रोहित सूर्यवंशी, सोहेल तांबोळी, महेश बीटलकर, हनुमंतसिंग सुरतबन्सी, फारुक शेख, नारायण यादव, लिंबराज यादव, शैलेश प्रकाशसिंग ठाकूर, सुलोचना ठाकूर, नसरुद्दीन वाडकर, गिरीधरसिंह बायस, मारुती यादव, शंकर देवकर, शिवचरण ठाकूर, धरमसिंग ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

ग्रामस्थांच्या या ठरावाकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने पाहून तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे.

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना : बँकेतून 19 लाखांची रक्कम, शेळ्या व घरफोडीत सोनं-रोख लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उमरगा, शिराढोण व नळदुर्ग या तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये चोरी व घरफोडीचे गुन्हे नोंदवले गेले असून लाखोंचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे.

उमरगा – ग्रामीण बॅकेवर डाका
दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 01.00 ते 04.15 वाजेच्या सुमारास उमरगा तालुक्यातील नाईचाकुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखेवर अज्ञात तिघा चोरट्यांनी धाड टाकली. बॅकेच्या चॅनेल गेटची कुलुपे तोडून आत प्रवेश करत त्यांनी तिजोरी गैस कटरने कापली व तब्बल ₹19,31,349 किंमतीचा रोख माल चोरून नेला. शाखाधिकारी अशिष नागनाथ बनसोडे (वय 30, रा. चिवरी, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 331(1), 305(अ)(इ), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शिराढोण – शेळ्या चोरीचा प्रकार उघड
कळंब तालुक्यातील ताडगाव येथील उत्रेश्वर रामा जाधवर (वय 32) यांचे घरासमोरून 22 ऑगस्टच्या रात्री 22.00 वाजता ते 23 ऑगस्टच्या पहाटे 05.30 वाजेच्या दरम्यान त्यांच्या तीन शेळ्या अंदाजे ₹30,000 किंमतीच्या चोरून नेण्यात आल्या. फिर्यादीनंतर शिराढोण पोलीसांनी तपास सुरू केला व संशयित आरोपींपैकी शिवराम सुभाष मुंडे याच्याकडून शेळ्या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुली दिली की, पिंटु माणिक काळे (रा. शिराढोण पारधी पिंडी), दत्ता सिताराम काळे व स्वतः शिवराम मुंडे (दोघे रा. गोविंदपूर, ता. कळंब) यांनी मिळून ही चोरी केली. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

नळदुर्ग – घरफोडीत सोनं व रोख लंपास
तुळजापूर तालुक्यातील खानापूर गावातील शैलाबाई चंद्रकांत लुगडे (वय 66) यांच्या उघड्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख मिळून ₹69,000 किंमतीचा माल चोरून नेला. ही घटना 22 ऑगस्टच्या रात्री 21.00 ते 23 ऑगस्टच्या पहाटे 03.00 वाजेदरम्यान घडली. फिर्यादीनंतर नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 305 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या सर्व घटनांमुळे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी चोरट्यांचा शोध अधिक गतीने सुरू केला आहे. तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत मोठ्या प्रमाणावर मालमत्तेविरुद्ध गुन्हे नोंदवल्याने जिल्हा पोलीस यंत्रणेची कसोटी लागली आहे.

खोट्या विवाहाच्या आमिषाने तरुणाची १.२० लाखांची फसवणूक

धाराशिव :
धाराशिव शहर पोलीस ठाण्यात खोट्या विवाहाच्या आमिषाने तरुणाची तब्बल १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बाळासाहेब हरिभाऊ मोरे (वय ३३, रा. वडगाव सी., ता. व जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी विवाहाचे आमिष दाखवून त्यांचा खोटा विवाह लावून दिला. या विवाहाच्या नावाखाली फिर्यादीकडून एकूण रु. १,२०,००० इतकी रक्कम घेतली. मात्र नंतर हा विवाह फसवा व बनावट असल्याचे उघड झाले.

ही घटना २३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून ते २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत वडगाव सी. परिसरात घडली.

या गुन्ह्यात आरोपी म्हणून –

  • युवराज पाटील, दशरथ्ज्ञ जहागीरदार (दोघे रा. पाटण, ता. पाटण, जि. सातारा),
  • शांताबाई (रा. बैलबाजार, भारत पेट्रोल पंपाजवळ, कराड),
  • अविनाश मिलींद साळवे (रा. गणेश नगर, वडाळा ईस्ट, मुंबई, मुळ रा. देवळी, ता. मानगाव, जि. सातारा)
  • व त्याची पत्नी दिपाली अविनाश साळवे (रा. पाटण, ता. पाटण, जि. सातारा)

यांचा समावेश आहे.

फिर्यादीच्या प्रथम खबरेवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोहाऱ्यात धक्कादायक घटना : घरगुती वादातून आईचा खून

लोहारा (जि. धाराशिव) – लोहारा शहरात कौटुंबिक वादातून आईचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलगा आणि सुनाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास उमाबाई सुरेश रणशुर (वय 55, रा. लोहारा) यांना घरगुती वादातून आरोपी सौदागर सुरेश रणशुर व त्याची पत्नी पूजा सौदागर रणशुर (दोघे रा. लोहारा) यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर उमाबाईंना ठार मारून, साडीने गळफास लावून आत्महत्येचा बनाव केला, असा आरोप आहे.

या घटनेची फिर्याद महेश सुरेश रणशुर (वय 35, रा. लोहारा, ह.मु. शिवहरी ग्रीन सिटी, वापी, जि. वलसाड, गुजरात) यांनी लोहारा पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 103(1), 352 तसेच 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर उमाबाई रणशुर यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. परंतु चौकशीतून मारहाण व खुनाचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे लोहारा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ; सरकारचा निर्णय तत्काळ लागू

मुंबई – राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून (PDS) अन्नधान्याचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट २०२५) जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, दुकानदारांना मिळणारे सध्याचे ₹१५०/- प्रति क्विंटल (₹१५००/- प्रति मेट्रिक टन) मार्जिन आता वाढवून ₹१७०/- प्रति क्विंटल (₹१७००/- प्रति मेट्रिक टन) करण्यात आले आहे.

२०१७ मध्ये निश्चित करण्यात आलेल्या जुन्या दरानुसार दुकानदारांना केंद्र शासनाचा ₹४५/- व राज्य शासनाचा ₹१०५/- असा मिळून एकूण ₹१५०/- मार्जिन मिळत होते. वाढीव खर्च लक्षात घेऊन रास्त भाव दुकानदार संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात होती. त्यानंतर १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली.

सुमारे ५३,९१० रास्त भाव दुकानदारांना या निर्णयाचा थेट लाभ होणार असून वाढीव खर्चाची तरतूद संबंधित अर्थसंकल्पीय शिर्षाखाली करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार ही वाढ तत्काळ लागू होणार आहे.

 

मोहा येथे दोन समाजामध्ये तणाव, तणावाचे रूपांतर दंगलीत व दगडफेकीत

दगडफेकीत अनेक पोलीस व ग्रामस्थ जखमी,  वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सतर्कतेने तणावपूर्ण शांतता


मोहा – दिनांक 25 ऑगस्ट रोजी सोमवारच्या सांयंकाळी
पारधी समाजातील व्यक्तीचे निधन झाले असता. दफन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्मशान भूमिमध्ये घेऊन गेले परंतु वनविभागाने रेकॉर्डली स्मशानभूमीसाठी दिलेली पाच गुंठे जागा सोडून इतर जागेत दफन केले. आणि त्याच जागेत मोहा गावाचा सिमोलंघनाचा कार्यक्रम होत असतो. पारधी समाजाने स्मशानभूमीची जागा सोडून ज्याठिकाणी कार्यक्रम होतो त्याच ठिकाणी दफन केले. आणि इथेच दोन समाजातील तेढ निर्माण होण्याचे कारण बनले.
  
  

दंगलीचे कारण ठरले स्मशानभूमीची जमीन

वनविभागाच्या आखत्यारीत असलेली जमीनी पैकी कागदोपत्री पाच गुंढे जमीन ही पारधी समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्यात आलेली असताना. पारधी समाजाने उर्वरित जागा अतिक्रमित करण्याचा घाट घातल्याचे दिसून आल्याने गावातील नागरिकांनी त्यांना अटकावं केला. त्याला कारणही तसेच आहे. गेली अनेक वर्षांपासून मोहा गावातील सिमोलंघांनाचा कार्यक्रम त्या जागेत होत आहे. आणि त्याच जागेत मयत व्यक्तीचा अंत्यविधी केला त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या.
त्यावेळी दोन्ही समाजाने चर्चेअंती नियमानुसार तोडगा काढू असे ठरवून सोमवारची रात्र घालवली. परंतु सोमवारची शांतता ही मंगळवारच्या वादळपूर्वीची शांतता ठरली.

कायदा सुव्यवस्थेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त

मंगळवारी सकाळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केला व दोन्ही समाजातील वातावरण निवळण्याचा चांगला प्रयत्न झाला. पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
रेकॉर्डनुसार सर्वकाही चालू असताना अचानक पारधी समाजातील काही लोकांनी दगडफेक सुरु केली.
जवळच असलेल्या गलोलीने दगडाचा वर्षाव सुरु केला.
दरम्यान पोलीस प्रशानाने थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु
दगडाचा वर्षाव व वेग भयानक असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. यामध्ये पोलीस प्रशासनाचे अधिकारी व शिपायी
जखमी झाले. तर गावातील नागरिकांची डोकी फुटली, काहींच्या हातांना, पायांना, इजा झाल्या. जखमीवर गावातीलच आरोग्य केंद्रात उपचार केले.
    

सध्या मोहा येथे तणावपूर्ण शांतता


दुपारी मोहा गावात दंगलीचे स्वरूप आले होते. परंतु सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने अधिकची कुमक मागवून घेतली. व परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सद्या मोहा गावात तणावपूर्ण शांतता आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ भूम तालुक्यामधून हजारो मराठा बांधवांची मुंबईकडे कूच

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

भूम प्रतिनिधी :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भूम तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव वाहनांसह मुंबईकडे रवाना होत आहेत. समाज बांधव तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती वरुन साधारण ११३५ चारचाकी वाहनाने. नागरिक जरांगेना साथ देण्यासाठी एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापच, कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय रहात नाय, आता कुठे जायचं मुंबईला जायचं, अशी जोरदार घोषणाबाजी करत आले. यावेळी सकल मराठा बांधवांना मार्गदर्शन करताना अनिल शेंडगे म्हणाले की आंदोलनातील सर्व चारचाकी वाहने वाहतुकीला अडथळा होणार नाहीत ,अशी ओळीत चालवाव्यात. तसेच तानाजी पाटील म्हणाले की आत्तापर्यंत सुसंस्कृतपणा दाखवत शांततेत ज्या पद्धतीने मोर्चे झाले त्याच पद्धतीने शांततेचे व शिस्तीचे प्रदर्शन करत मुंबईला पोहोचावे व आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेत मुंबई पोहोचावे. तर ऍड. रामराजे साळुंके म्हणाले की कोर्टाने कुठलाही आदेश काढून मुंबईला येण्यास मज्जाव केलेलानाही त्यामुळे कुठल्याही संकोच न बाळगता सकल मराठा बांधवांनी मुंबईस निघावे. तसेच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की यावेळी सहभागी आंदोलनाला येणाऱ्या सर्व समाज बांधवांची सर्व सोय ठीक ठिकाणी असेलच पन येणाऱ्यांनी देखील आपआपली तयारी ठेवावी जेणे करून कुठलीही गैर सोय होणार नाही. मनोज जरांगे यांच्या सूचने नुसारच आंदोलनाची रूपरेषा असेल असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले .

सणासुदीत खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी; छावा संघटनेची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे तक्रार

धाराशिव – सणासुदीच्या आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने अवाजवी तिकीट दर आकारले जात असल्याचा गंभीर आरोप छावा संघटनेने केला आहे. या अन्यायकारक लुटीविरोधात छावा संघटनेतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. राकेश पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र मोटर वाहन कायद्याने व परिवहन विभागाने ठरवलेले अधिकृत दर न पाळता काही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहेत. प्रवाशांकडून आकारले जाणारे अवाजवी दर पाहता सामान्य जनतेत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :

  • सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांवर काटेकोर नियंत्रण ठेवावे.
  • जास्तीचे भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई करावी.
  • अधिकृत भाडेदरांची यादी बसस्थानकांवर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात व संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.
  • विशेष तपासणी पथक नेमून अवाजवी दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सविरुद्ध कार्यवाही करावी.
  • प्रवाशांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सक्रिय ठेवावी व त्यावर तत्काळ कारवाई करावी.
  • काही ट्रॅव्हल्स परमिटशिवाय वाहने चालवत असून, फिटनेस, विमा व चालक परवाना नियमांचे पालन होत नाही.

प्रवाशांच्या आर्थिक व शारीरिक सुरक्षेच्या दृष्टीने या मागण्या तातडीने मान्य करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका छावा संघटनेने घेतली आहे.

धाराशिव शहर काँग्रेसकडून नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन

धाराशिव | दि. 26 ऑगस्ट 2025

धाराशिव शहरातील वाढत्या नागरी समस्यांबाबत नगर परिषद प्रशासन व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत शहर काँग्रेसतर्फे आज नगर परिषद कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नागरिकांना मुलभूत सुविधा न मिळाल्याने त्रस्त जनतेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही विविध निवेदने, आंदोलने तसेच दिनांक 09 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या चर्चेत हे मुद्दे मांडण्यात आले होते. परंतु समस्यांचे निराकरण न झाल्यामुळे आज पुन्हा आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या :

  1. शहरातील अस्वच्छता व दुर्गंधी दूर करून नियमित व योग्य स्वच्छता व्यवस्था करावी.
  2. भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
  3. धिम्या गतीने सुरू असलेली भुयारी गटार योजना दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावी.
  4. मंजूर 140 कोटी रुपयांच्या 59 रस्ते व नाल्यांच्या कामांना तातडीने सुरुवात करावी.
  5. शहरात नागरिकांसाठी उद्यानांची निर्मिती व सुशोभीकरण करावे.
  6. आठवडी व दररोजच्या बाजारातील सोयीसुविधा वाढवाव्यात.
  7. बंद पडलेले पथदिवे कार्यान्वित करावेत.
  8. पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक प्रमाणात करावा.
  9. कचरा डेपोचे स्थलांतर करून रहिवाशांना दिलासा द्यावा.
  10. भोगावती नदी स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी ठोस नियोजन करावे.
  11. रस्त्यांवरील धुळीवर नियंत्रण ठेवून आरोग्य धोक्यांपासून नागरिकांना वाचवावे.
  12. वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी.
  13. जुन्या तात्पुरत्या मंजूर रेखांकनांना अंतिम मंजुरी द्यावी.

आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती

या आंदोलनात विश्वास शिंदे, राजाभाऊ शेरखाने, खलील सय्यद, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, ॲड. जावेद काझी, डॉ. स्मिता शहापूरकर, सय्यद नादेरुल्लाह, विजय मुद्दे, उस्मान कुरेशी, मिलिंद बनसोडे, प्रेमानंद सपकाळ, अशोक बनसोडे, प्रभाकर लोंढे, मन्सूर कुरेशी, एक्बाल कुरेशी, यासेर काजी, सरफराज काजी, धवलसिंह लावंड, सागर गायकवाड, अलीम एल.डी., हरिदास शिंदे, कपिल सय्यद, सय्यद काजी, शेख मुद्दिक, महादेव पेठे, संतोष पाटील, अब्दुल लतीफ, शहानवाज सय्यद, प्रशांत पाटील, संजय गजधने, आनंद बनसोडे, सय्यद मन्सूर, जयसिंग पवार, शिंदे विश्वासराव, उमेश राजेनिंबाळकर, अजहर पठाण, शेख हज्जू, शेख नूर, ऋषिकेश बनसोडे, अभिषेक बनसोडे, नंदकुमार पडवळ, राजेंद्र कुराडे, ॲड. राजुदास आडे आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसने इशारा दिला आहे की, जर वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक पाऊले उचलली नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.

तुळजापूरमध्ये ऑनलाइन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: पिता-पुत्राची १६ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक

धाराशिव, २४ ऑगस्ट २०२५: डिजिटल युगात वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. तुळजापूर तालुक्यातील एका ५४ वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या मुलाची अज्ञात आरोपींनी जास्त पैशांच्या आमिषाने फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घटनेच्या तपशीलानुसार, फिर्यादी कालीदास लिंबाजी गवळी (वय ५४ वर्षे, रा. शुक्रवार पेठ, कणे गल्ली, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या मुलाला कृष्णा याला आरोपींनी जास्त पैशांचे आमिष दाखवले. शासनाने ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातलेली असतानाही, आरोपींनी ‘exchange.com’ नावाची एक बनावट लिंक तयार करून ती व्हॉट्सअॅपवर पाठवली. या लिंकद्वारे फिर्यादी आणि त्यांच्या मुलाची एकूण १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.

फिर्यादीनुसार, आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल नंबरांवरून संपर्क साधला. यात ९०९१९१५८९१, ९५६१४६३८०८, ८४८५०१७४९०, ८७६६४०६५०७, ८४४६२२३५८४, ८०१०७८१८३९, ८४४६९६४५५४ आणि ७३९१८२२००८८ या नंबरांचा समावेश आहे. हे नंबर वापरून आरोपींनी विश्वास संपादन करत फिर्यादींना बनावट योजनेत गुंतवले आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली.

या घटनेची फिर्याद कालीदास गवळी यांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायबर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ७८, ३५६(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपींच्या मोबाइल नंबर आणि बनावट लिंकचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.