मुरुमायण चा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात — ढिम्म प्रशासन आता तरी हालेल का?

0
76

भाग ४

धाराशिव – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणाऱ्या मुरुमाच्या अवैध उत्खननाचे प्रकरण ‘मुरुमायण’ या नावाने जिल्ह्यात चांगलेच गाजू लागले असतानाच, आता या चेंडूची उंच फेक थेट पालकमंत्र्यांच्या कोर्टात झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत झोपलेले प्रशासन जागे होईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

मुंबईत नुकतीच धाराशिव जिल्ह्यातील विविध विकासकामांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीस जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान काक्रंबा उड्डाणपुलासाठी सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खननाचा मुद्दा समोर आला आणि सूत्रांच्या माहितीनुसार, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

हे प्रकरण बाहेर आल्यावरही अद्याप कंत्राटदारावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे सामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. उलटपक्षी, महसूल प्रशासनाचा मूक पाठिंबा असल्याची शंका अधिकच बळावली आहे. या सगळ्या प्रकारातून शासनाचा लाखोंचा महसूल गमावला जात आहे आणि याला जबाबदार ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.

तहसीलदार ज्योती चव्हाण यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, “उत्खनन खरंच अवैध पद्धतीने झाले आहे का, यासाठी ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून चौकशी केली जाणार आहे. कंत्राटदाराने दोन गटातून परवानग्या घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणात तहसीलदार अरविंद बोळंगे व संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी यांना वस्तुस्थिती तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.

मात्र याआधी जे काही घडले, ते प्रशासनाच्या थंडपणामुळेच घडले असल्याचा आरोप आता जनतेकडून केला जात आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांच्या निर्देशांनंतर जिल्हा प्रशासन खरेच हालते का, की पुन्हा एखाद्या नव्या मुरुमायणची वाट पाहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here