धाराशिव : भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातील यशस्वी नेतृत्वाची दखल घेत जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा त्यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.
दत्ता कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मागील कार्यकाळात नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अशा महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला धाराशिव जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळाले होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या विश्वासामुळे भाजपाची घडी जिल्ह्यात अधिक बळकट झाली होती.
नव्या कार्यकाळातही पक्ष संघटन मजबूत करण्यासोबत आगामी निवडणुकांची तयारी, स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका आणि जनसंपर्क वाढवणे या दिशेने ते काम करतील, असा विश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त केला जात आहे.