मुंबई – राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च रोजी झालेल्या बैठकीत ही चर्चा करण्यात आली. त्यानंतर 26 मार्च 2025 रोजी राज्याच्या कृषी विभागाने कृषी आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, 2025 च्या खरीप हंगामापासून नवीन पिक विमा योजना राबवली जाईल.
चुनावी आश्वासनाची फसवणूक; शेतकऱ्यांना फसवले
महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी एक रुपयात पिक विमा योजना हे मोठे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन आता केवळ जुमलाच ठरले आहे. याआधी “लाडकी बहीण” योजनेसह अनेक आश्वासने पाळली गेली नाहीत. त्याच धर्तीवर एक रुपयात पिक विमा योजना गुंडाळण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या कोपराला गुळ लावल्याची भावना बळीराजामध्ये निर्माण झाली आहे.
योजना बंद करण्याची कारणे आणि गैरव्यवहाराचे आरोप
सन 2023 पासून राज्यात एक रुपयात पिक विमा योजना राबवण्यात आली. मात्र, योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. सामूहिक सुविधा केंद्र (CSC) चालकांनी बनावट अर्ज दाखल करून अपात्र व्यक्तींना विम्याचा लाभ दिला. याशिवाय शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पिकांच्या ऐवजी जास्त विमा रक्कम मिळवण्यासाठी अन्य पिकांची माहिती दर्शवली. शासकीय जमिनी, मंदिरांच्या जमिनी आणि अकृषिक जमिनींवरही विमा काढल्याचे प्रकार समोर आले.
कंपनीला प्रत्येक अर्जावर 40 रुपये मिळतात, याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात बनावट अर्ज दाखल करण्यात आले. परिणामी, राज्य शासनाने योजनेतील अडचणी लक्षात घेऊन यास पुन्हा नव्याने संरचित करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि विमा कंपन्यांचा फायदा
सन 2016 ते 2024 या आठ वर्षांत राज्य शासनाने पिक विमा योजनेसाठी 43,201 कोटी रुपये विमा कंपन्यांना दिले. परंतु शेतकऱ्यांना केवळ 32,658 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. परिणामी, विमा कंपन्यांनी तब्बल 10,543 कोटी रुपये नफा मिळवला. याशिवाय, विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी असल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले.
इतर राज्यांचे मॉडेल आणि महाराष्ट्राचा पुढील मार्ग
गुजरातने पिक विमा योजनेतून बाहेर पडून थेट पावसाच्या प्रमाणावर आधारित मदत योजना राबवली आहे. ओडिशामध्ये एक रुपयात पिक विमा केवळ दोन हेक्टरपर्यंतच लागू आहे. आंध्रप्रदेशमध्ये राज्य सरकार 100% पीक पाहणी करून विमा हप्ता भरते. याउलट, राजस्थानमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तींसाठी विमा संरक्षण नाही.
महाराष्ट्र राज्याने यापुढे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खरीप, रब्बी आणि नगदी पिकांसाठी अनुक्रमे 2%, 1.5% आणि 5% विमा हप्ता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिल जगताप यांची प्रतिक्रिया
पिक विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी राज्य शासनाच्या निर्णयावर टीका केली आहे. “गैरव्यवहार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, परंतु योजना बंद करणे योग्य नाही. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळण्यासाठी ही योजना सुरूच ठेवली पाहिजे. सरकारने पीक विमा नुकसान भरपाईच्या प्रक्रियेत सुधारणा करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या मनात ही योजना केवळ निवडणुकीसाठी होती, अशी भावना निर्माण होईल.”

नवीन धोरणाची अंमलबजावणी
2025 च्या खरीप हंगामापासून नवीन पिक विमा योजना लागू होईल. यामध्ये कापणी प्रयोग आधारित उत्पादनावर विमा रक्कम निश्चित केली जाणार आहे. तसेच, 50% उत्पादनाची माहिती तंत्रज्ञान आधारित पद्धतीने घेतली जाणार आहे. ही योजना राज्यस्तरीय ट्रस्टच्या माध्यमातून राबवण्याचा प्रस्तावही शासनाने दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात असून, सरकारने लवकरच अंतिम निर्णय घेऊन याबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.
- बोर्डा पाझर तलावातील बेकायदेशीर कृत्यांवर प्रशासन कधी दाखवणार डोळसपणा?
- मुख्यालयात ठिय्या देऊन बसलेल्या महसूल कर्मचाऱ्यांविरोधात अमोल जाधव यांची तक्रार, बदल्यांमध्ये पक्षपाताचा आरोप
- शेतजमिनीच्या मोजणीसाठी लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक रंगेहाथ अडकला!
- एक रुपयातील पीक विमा योजना बंद; शेतकऱ्यांवर दरवर्षी ७०० कोटींचा आर्थिक बोजा
- राणा पाटील हेच भ्रष्टाचाराचे भस्मासुर – राज निकम यांचा घणाघात