कनगरा/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षण विभागात खळबळ माजवणारी ठरली कारण या तारखे दिवशी बरेच १० वी चे विद्यार्थी पास तर बेंबळी येथील मुख्याध्यापक ए.ए.खतीब हे ड्युटी करण्यात नापास झाले आहेत. तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक ए. ए. खतीब यांच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. कोरोना कक्षामध्ये ड्युटी न करता गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये महानगर व अन्य शहरातून आलेल्या नागरिकांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन कक्ष सुरू करण्यात आला होता. या कक्षामध्ये खतीब यांना 19 मे रोजी नियुक्त करण्यात आले होते. परंतु ते गैरहजर राहिले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शिवसेनेचे नेते श्यामसुंदर पाटील, नितीन खापरे पाटील, युवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष किरण चव्हाण, विशाल शहा यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. तहसीलदारांनी तातडीने पथक पाठवून ऑन द स्पॉट पंचनामा केला. यामध्ये खतीब गैरहजर राहिले असल्याचे निदर्शनास आले. यानंतर या प्रकरणी शिक्षण विभागाने व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते गालिब पठाण,
नितीन खापरे पाटील यांच्या मार्गदर्शनात श्यामसुंदर पाटील यांनी चौकशी समितीसमोर पुरावे सादर केले. या पुराव्याच्या आधारे तसेच तहसीलदारांनी दिलेल्या निर्देशानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते यांनी खतीब यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
सदरील आदेशामध्ये नमूद केल्यानुसार उस्मानाबाद तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू आहे त्याअनुषंगे अतितात्काळ कामकाज चालू असून अश्या परिस्थितीत वेळोवेळी आदेशीत केल्यानुसार कामकाज करणे अपेक्षित आहे.पण दि.१९/०५/२०२० रोजी मंडळ अधिकाऱ्यांनी बेंबळी येथील कोरोना सहाय्यता कक्षास भेट दिली असता कक्ष बंद असल्याचे दिसून आले.त्यावेळी तिथे मुख्याध्यापक ए.ए.खतीब यांची ड्युटी होती त्यानुसार सदरील शिक्षकास कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला.व खतीब यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्याचे सदरील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद केले आहे.त्यामुळे जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मुख्याध्यापक श्री ए.ए.खतीब यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
त्यांना परंडा येथे धारण अधिकार बहाल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कोरोना कक्षात काम न करता कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.