उस्मानाबाद,
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांची संकल्पना आणि आयोजनातून सिद्ध झालेली स्वराज्य ध्वज यात्रा राज्यात चर्चेचा विषय ठरते आहे. स्थानिकांसह राजकीय वर्तुळातही स्वराज्य ध्वजाविषयी उत्सुकता आहे.तळागाळातून अनेक जिल्हा,शहरे,गावांमधून स्वराज्य ध्वज अडचणींची पर्वा न करता पोहोचत आहे आणि यशाची पावती मिळवत आहे.काल संध्याकाळी लातूरजवळ तेरमध्ये या स्फूर्तीदायी स्वराज्य ध्वजाला अभिवादन करण्यात आले. प्रवासाच्या तिस-या टप्प्यात तेराव्या दिवसात सायंकाळी ध्वज मोहिमेने दि.२१ सप्टेंबर रोजी संत गोरोबा काका मंदिराजवळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे
सक्षणा ताई सलगर युवती प्रदेश अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापसिंह पाटील,तेर संस्थानचे रघुनंदन महाराज,डॉ.तानाजी काटे,सतीश काका एकंडे,धीरज घुटे,प्रशांत कवडे,रोहित बागल,बबलू कोळपे,प्रेमचंद मुंडे,अजित मदने, रणधीर सलगर,विश्वनाथ मदने, सचिन पांढरे,सुनील आंधळे, आदी पदाधिका-यांनी ध्वज पूजन केले.
गेले तेरा दिवस कोविड साथरोगाच्या काळातही कोविडसंबंधीचे सर्व आवश्यक नियम पाळून अत्यंत नियोजनबद्ध रितीने स्वराज्य ध्वज मोहिम राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून महत्त्वाकांक्षी प्रवास करत आहे.स्वराज्य ध्वजाने आतापर्यंत एकवीस जिल्ह्यांना भेट दिली आहे. या सर्व जिल्ह्यांमधून स्वराज्य ध्वजाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शक्ती,निष्ठा, संयम,प्रगती, त्याग,संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतलेला आहे.स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच थरांमधून उत्फुल्ल प्रतिसाद मिळत आहे.आतापर्यंत हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीमय अनुभव घेतला आहे.
महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत होत आहे. प्रवासातील खराब हवामान,मुसळधार पाऊस, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवत या ध्वज पूजन मोहिमेने आपला यशस्वी प्रवास सुरूच ठेवला आहे. आतापर्यंत राज्यातील यशस्वी प्रवासाशिवाय राज्याबाहेरील दोन राज्यांमध्ये देखील हि ध्वज यात्रा पोहोचली आहे.
सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे अशी माहिती स्वराज्य ध्वजाचे संकल्पनाकार आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक,आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण स्वराज्य ध्वज संकल्पनेला ध्वज मोहिम यात्रेचं मूर्त स्वरूप दिल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.
दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक,प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच मथुरा-वृंदावन, केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे),बडोदा संस्थानचे अधिपती,गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधिक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.