Home Blog Page 14

सायबर फसवणुकीतील संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात धाराशिव सायबर पोलिसांना मोठे यश

क्रेडिट कार्डमधून १.९९ लाखांची ऑनलाईन खरेदी रद्द करून तक्रारदाराला पूर्ण रक्कम परत

धाराशिव, दि. २ ऑगस्ट –
सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन फसवणुकीतून चोरट्या पद्धतीने घेतलेल्या १,९९,०००/- रुपयांची संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात धाराशिव सायबर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक कौशल्य आणि तात्काळ कारवाई करत आरोपीने ऑनलाईन खरेदीसाठी वापरलेली ऑर्डर रद्द करून ही रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत पाठवण्यात यश मिळवले.

फसवणुकीची घटना

कळंब तालुक्यातील रहिवासी श्रीमती रिया निखिल अंधारे (वय २१), व्यवसायाने गृहिणी, यांना दिनांक २३ जुलै २०२५ रोजी व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘आरटीओ चलन’ या नावाची एक APK फाईल प्राप्त झाली. ही फाईल त्यांनी डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपीचे मेसेज येऊ लागले आणि काही क्षणांतच त्यांच्या क्रेडिट कार्डमधून १,९९,०००/- रुपये विथड्रॉल झाल्याचे मेसेज प्राप्त झाले.

सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करून NCCR पोर्टलवर क्र. ३१९०७२५०१२७२५३ अंतर्गत तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांची तत्पर कारवाई

तक्रार प्राप्त होताच धाराशिव सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली. फसवणूक झालेली रक्कम इन्फीबीम ॲव्हेन्यू या पेमेंट गेटवेमार्फत ड्राईव्ह ट्रॅक प्लस – HPCL या कंपनीकडे वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी ईमेल व दूरध्वनीद्वारे तात्काळ संपर्क साधला.

तपासात उघड झाले की, आरोपीने या रकमेचा वापर करून ऑनलाईन शॉपिंग केली होती. सायबर पोलिसांनी ती खरेदी थांबवण्याचा आणि ऑर्डर रद्द करून रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर सायबर पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्याने संबंधित ऑनलाईन खरेदीची ऑर्डर रद्द करण्यात आली आणि संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत केली गेली.

पोलिसांची टीम आणि मार्गदर्शन

ही संपूर्ण कारवाई  पोलीस अधीक्षक शफकत आमना  यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चोरमले, सपोनि कामुळे, पोउनि सर्जे, सफौ कुलकर्णी, पोहक. हालसे, मपोना पौळ, पोशि सुर्यवंशी, मोरे, तिळगुळे, कदम, काझी, शेख, खांडेकर, शिंदे, पुरी, अंगुळे, बिराजदार, गाडे, जाधवर आणि भोसले यांनी संयुक्तपणे केली.


1 ऑगस्टला जयंती 16 जुलै ला आठवण, सत्ता असतानाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पत्रप्रपंच

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भिजत घोंगडे

धाराशिव – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे राजकारण सुरू असून गतवर्षी त्यांच्या स्मारकासाठी जागा मिळून देखील वर्षभर स्मारक होण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले नाहीत मात्र जयंती जवळ आल्याने विचारणा होईल म्हणून जयंतीच्या तोंडावर जागा विनाशुल्क देण्याचे पत्र तुळजापुरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी महसूलमंत्र्यांना दिल्याने सरकारने आणि प्रशासनाने हे स्मारक होण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
1 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे स्मारकासाठी दूध संघाची 1 एकर जागा देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय काढला तो काढल्यानंतर वेगाने हालचाल अपेक्षित होती, नगरपालिकेवर प्रशासक म्हणजे सरकारची सत्ता असताना त्याबाबत वर्षभरात कुठलीच कार्यवाही झाली नाही. स्मारक व्हावे म्हणून आ. कैलास पाटील यांनी विधानसभेत 2023 मध्ये आवाज उठवला होता त्यानंतर स्मारक मंजूर देखील झाले. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी 16 जुलै 2025 रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिले त्यात त्यांनी नळदुर्ग येथे महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी आणि धाराशिव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या जागेसाठी नगरपरिषदांकडे निधी नसल्याने त्याचे मूल्यांकन माफ करावे असे पत्र लिहिले. सत्ताधाऱ्यांनी पाठपुरावा केला याबाबत दुमत नाही मात्र जयंती डोळ्यासमोर ठेऊन पत्र आणि निवेदने सादर केली जात असतील ते देखील सत्ता असताना तर त्याला गतिमानता म्हणावी का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या पत्रावर अवर सचिव महसूल आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांना तत्काळ प्रस्ताव करण्याचे निर्देशित केले असले तरी उद्या जयंती असताना कुठल्याच हालचाली दिसत नाहीत मात्र पत्रप्रपंच न होता तातडीने स्मारकावर काम करण्याची नागरिकांची मागणी आहे. स्मारकासाठी जागा मंजूर झाली त्या शासन निर्णयामध्ये मूल्यांकन करून संबंधित शासन यंत्रणेकडून ती रक्कम वसुली करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आहेत. यानिमित्ताने धाराशिव नगरपालिका निधी भरण्यास सक्षम नसेल तर प्रशासक काळात नगरपालिकेतील पैसा नेमका गेला कुठे? अनाठायी कामासाठी निधी वापरला गेला का? त्याला प्रशासक जबाबदार की सरकार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत.

भुम शहरात ३१ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी लागू — आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय


धाराशिव | ३० जुलै २०२५
भुम शहरातील आण्णाभाऊ साठे नगर परिसरात ३१ जुलैपासून ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भुम शहरात दरवर्षीप्रमाणे मातंग समाजातर्फे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येते. मात्र यंदा मातंग समाजाचे तीन गट समाज मंदिरासमोरच कार्यक्रम घेण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने त्यांच्यात मतभेद व तणाव निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने सर्व गटांना समजावून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले होते, परंतु ते निष्फळ ठरल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली.

या पार्श्वभूमीवर, पोलीस निरीक्षक, भुम यांच्या शिफारसीनुसार व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, ३१ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आण्णाभाऊ साठे नगरमधील मातंग समाज मंदिराच्या ३० मीटर परिघात चार किंवा अधिक लोकांच्या जमावावर बंदी घालण्यात आली आहे.

कोणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

हा आदेश आज, ३० जुलै रोजी अधिकृतरित्या लागू करण्यात आला असून तो संबधित परिसरात लागू राहील.


श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी समिती गठीत – उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई / तुळजापूर :
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर द्वारा संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय ३० जुलै २०२५ रोजी जारी केला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार, संस्थेच्या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून शासकीय तत्त्वावर महाविद्यालय हस्तांतरित करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय दृष्टीने योग्य निर्णय घेणे हे समितीचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

समितीचे सदस्य खालीलप्रमाणे आहेत :

  1. श्री किरण लाढाणे – प्रादेशिक सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग, छ. संभाजीनगर – अध्यक्ष
  2. डॉ. स्मिता कोकणे – मुख्य लेखा व भांडार पडताळणी अधिकारी, तंत्रशिक्षण संचालनालय – सदस्य
  3. श्री अरविंद बोळंगे – तहसीलदार, तुळजापूर व विश्वस्त सदस्य – सदस्य
  4. डॉ. संजय डंभारे – प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छ. संभाजीनगर – सदस्य
  5. श्री रविंद्र आडेकर – प्र. प्राचार्य, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय – सदस्य सचिव

समितीचे कार्य आणि उद्दिष्टे :

या समितीला महाविद्यालयाच्या जागेची स्थिती, भौतिक पायाभूत सुविधा, बांधकाम, मनुष्यबळ, आर्थिक भार, यंत्रसामुग्री, उपकरणे, कागदपत्रे आणि इतर सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करणे अपेक्षित आहे.

  • प्रस्तावित अहवाल ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
  • AICTE (अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद) व विद्यापीठाच्या निकषांनुसार सर्व माहिती एकत्रित करून नियोजन केले जाईल.
  • संस्था हस्तांतरणासाठी आवश्यक त्या कायद्याच्या प्रक्रिया, जमिनीचे हक्कदस्तावेज, बांधकाम परवाने, कर्मचारी हस्तांतरण, तसेच आर्थिक नियोजन या सर्व बाबींचा समावेश प्रस्तावित अहवालात करण्यात येईल.

शासनाची पुढील कार्यवाही :

या अहवालाच्या आधारावर शासन व ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार (MoU) होणार असून, अंतिम निर्णयानंतर संबंधित प्राधिकरणांमार्फत संस्था शासकीय स्वरूपात कार्यान्वित होईल. यामुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा, आर्थिक मदत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक पाऊल

शासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खासगी संस्थांतील अडचणी, आर्थिक तंगी, अनियमितता यावर उपाय म्हणून शासनाचे नियंत्रण येणे ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

तुळजापूरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे पाऊल शैक्षणिक प्रगतीची संधी निर्माण करणारे ठरणार आहे.

धाराशिव शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था; नागरिकांचा संताप शिगेला

 7 ऑगस्ट रोजी रास्ता रोकोचा इशारा!

धाराशिव –

 धाराशिव शहरातून जाणाऱ्या बार्शी-औसा राज्यमार्ग व जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान मंदिर या दोन्ही प्रमुख रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. संबंधित यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी 7 ऑगस्ट रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शहरातील बार्शी ते औसा हा राज्यमार्ग, जो जिजाऊ चौक ते भवानी चौक सांजा रोडपर्यंत जातो, सध्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. या मार्गालगत शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, शासकीय कार्यालये असल्यामुळे प्रचंड वर्दळ असते. मात्र रस्त्यावर पावसाचे पाणी साचून खडी उखडली असून, खड्ड्यांमुळे अनेकजण अपघातग्रस्त होत आहेत. दुर्दैवाने एका तरुणाचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक कायमचे अपंग झाले आहेत.

विशेष म्हणजे या रस्त्याच्या काम महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (मुंबई) यांच्यामार्फत ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी कंत्राटदाराशी करार करून मंजूर झाले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी भूमिपूजनही केले होते. परंतु या कामाला नऊ महिने झाले तरी अद्याप सुरुवात झालेली नाही. वाहनचालकांना मणक्याचे विकार जडत आहेत, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे व मानसिक त्रास वाढला आहे.

त्याचप्रमाणे, जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान मंदिर (नितीन आदमिले ते लाटे घर) हा सीसी रस्ता २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नगर परिषदेने मंजूर करून कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिलेला आहे. हे काम ३०० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित होते, पण साडेतीन वर्षांनंतरही काम सुरू झालेले नाही. या रस्त्याची अवस्था सुद्धा भयावह असून नागरिकांना तेच हाल सहन करावे लागत आहेत.

या दोन्ही रस्त्यांच्या कामांना तातडीने सुरुवात करावी, अन्यथा ७ ऑगस्टपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा खालील नागरिकांनी दिला आहे

   या निवेदनावर शहाजी भोसले, प्रशांत पाटील, विनोद वीर, दौलत निपाणीकर, संतोष हंबीरे, रवी वाघमारे, शेखर घोडके, उमेश राजेनिंबाळकर, रोहित बागल, सोमनाथ गुरव, सिद्धार्थ बनसोडे, बाबा मुजावर, तुषार निंबाळकर, मिनिल काकडे, आदित्य पाटील, अभिराज कदम, राणा बनसोडे, महादेव माळी, शौकत शेख, राकेश सुर्यवंशी, बंडू आदरकर, पंकज पाटील, सुमित बागल, पंकज भोसले, धवलसिंह लावंड, अभिषेक बागल, अक्षय खळदकर, नाना घाटगे, अमित उंबरे, जयंत देशमुख, सुरज वडवले, सह्याद्री राजेनिंबाळकर, ॲड. तनुजा हेड्डा, मनोज उंबरे, कालिदास शेरकर, प्रदीप घुटे, विजय माकरवार, दत्तात्रय गोरे, शेषेराव दुधनाळे, एम.बी. बनजगोळे, वैजीनाथ नरुणे, प्रेमानंद सपकाळ, ऋषी राऊत, अजिंक्य हिबारे, सतीश लोंढे, विनोद केजकर, शहाजी पवार, अतुल खराडे, हर्षद ठवरे, तौफिक काझी, अबरार कुरेशी, सात्विक दंडनाईक आदी नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण प्रकरण उघडकीस : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यशस्वी कारवाई, तीन आरोपींना अटक

धाराशिव, – पुण्यातून अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीची सुटका करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. ही कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पो.ह. विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पो.ना. बबन जाधवर व चालक पो.ह. महेबुब अरब यांच्या पथकाने ही कारवाई केली.

घटनाक्रम असा की, पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपूर्वी एका दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची माहिती पो.उ.नि. निलेश मोकाशी यांनी धाराशिव गुन्हे शाखेला दिली होती. त्यानंतर तपासदरम्यान तुळजापूर येथील सुनिल सिताराम भोसले व त्याच्या साथीदारांवर संशय आल्याने पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुरू केली.

तपासात समोर आले की, सुनिल भोसले (वय ५१, रा. तुळजापूर), शंकर उजण्या पवार (वय ४०, रा. हासेगाव, ता. लातूर) आणि शालुबाई प्रकाश काळे (वय ३५, रा. तुळजापूर) या तिघांनी पुण्यातून कोमल धनसिंग काळे (वय २ वर्षे) हिला अपहरण करून लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथे ठेवले होते.

पथकाने या तिघांना ताब्यात घेत अपह्रुत मुलीची सुखरूप सुटका केली. यानंतर सर्व आरोपी व मुलीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे येथील पो.उ.नि. निलेश मोकाशी व मपोअं डुकरे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही धाडसी व वेगवान कारवाई करत चिमुकलीला तिच्या कुटुंबाकडे सुखरूप परतवणाऱ्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दुर्गप्रेमी, मराठी भाषा प्रेमी उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर संपूर्ण देशाच्या राजकीय-सांस्कृतिक चेतनेचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी उभारलेले गड-किल्ले या मातीतल्या अभिमानाचे प्रतीक आहेत. आज तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोनसारख्या साधनांद्वारे हे दुर्गदुर्गेश्वर पाहता येतात, मात्र दोन दशकांपूर्वी एका छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली ही दुर्गचित्रे आजही जनतेच्या मनात घर करून आहेत.तो छायाचित्रकार होता – उद्धव ठाकरे.

१९९०च्या दशकात “माझा गड माझा अभिमान” या छायाचित्रमालिकेद्वारे उद्धव ठाकरे यांनी शिवरायांचे किल्ले, त्यांची शौर्यगाथा, वास्तूशास्त्र, आणि निसर्गसौंदर्य एकत्रित करून जनतेपुढे सादर केलं. मला उद्धव ठाकरे हे नाव प्रथम याच संग्रहामुळे परिचित झालं. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची आर्तता आणि प्रेरणा जनमानसापर्यंत पोहोचवणाऱ्या या कार्यासाठी त्यांचे कौतुक व्हायलाच हवे.

महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस
शुभेच्छुक – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव

अर्थात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे आधीच राजकीय व सामाजिक क्षेत्रात परिचित होते. पण २०१९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने त्यांची एक वेगळी, निर्णायक ओळख निर्माण झाली.


🏛️ राजकीय लाटेतील वेगळा प्रवाह

२०१४ नंतर देशात “भाजप म्हणजे सत्ता” आणि “सत्ता म्हणजे भाजप” हे समीकरण दृढ होत चालले होते. विविध राज्यांतील नेते भाजपात सामील होऊ लागले. विरोधकांची अवस्था कमकुवत होत चालली होती. त्याच काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीची कल्पना मांडून सत्ता स्थापनेचा एक वेगळा मार्ग निवडला – आणि मुख्यमंत्री झाले.

या निर्णयाची किंमत मात्र मोठी होती.

भाजपला ही घडामोड सहज पचली नाही. सत्तेपासून दूर राहिलेल्या शक्ती, माध्यमं आणि केंद्रीय यंत्रणा – हे सगळं उद्धव ठाकरेंच्या सरकारविरोधात उभं राहिलं. आणि नंतर आलेलं कोविड संकट ही आणखी एक मोठी परीक्षा ठरली.


🦠 कोविड काळातील नेतृत्व: संवादातून धैर्य

महाराष्ट्र हे देशातील आर्थिक आणि औद्योगिक केंद्र. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशभरातून कामासाठी येणारे कामगार – या सगळ्यांमुळे राज्यात कोविडचा प्रसार अधिक झपाट्याने झाला. मात्र या कठीण काळात उद्धव ठाकरे यांनी घेतलेला संयमित आणि संवादात्मक दृष्टिकोन उल्लेखनीय ठरला.

  • गरिबांसाठी ‘शिवभोजन थाळी’ ही योजना सुरू करून कोणी उपाशी झोपू दिलं नाही.
  • फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी थेट संवाद साधला, धीर दिला.
  • स्थलांतरित मजुरांच्या व्यवस्थापनात राज्य प्रशासन पुढे होतं.
  • त्यांच्या भाषेतील साधेपणा आणि आपलेपणा सामान्य माणसाला भिडत होता.

महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस
शुभेच्छुक – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव

🛡️ राजकीय घात: बंडखोरी आणि न्यायालयीन लढा

कोविड काळात उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. ते प्रत्यक्ष भेटीगाठी करू शकत नव्हते. अशा स्थितीतच पक्षातील काही नेत्यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी स्वेच्छेने होती की करवून घेतली गेली – हे प्रश्न आजही जनतेच्या मनात आहेत.

या काळात राजकारणाचा स्तर खालावला. आजारी असलेल्या नेत्याविरुद्ध कारवाया करणं – हे रणभूमीचे नव्हे, तर लोकशाहीचे नियमही भंग करणारे होते.

तरीही उद्धव ठाकरे डगमगले नाहीत. त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आपल्या पक्षासाठी लढा दिला. लोकसभा निवडणुकीत प्रचार करून पक्षाच्या जागा वाढवल्या. त्यांच्या उपस्थितीचा प्रभाव मित्रपक्षांच्या मतांवरही दिसून आला.


🗳️ निवडणुका, शंका आणि नव्या लढ्याची सुरुवात

पुढील विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता आली, मात्र त्याच्या निकालात अचानक वाढलेली मतदानाची आकडेवारी प्रश्न निर्माण करणारी ठरली. विजयानंतरही महायुतीच्या नेत्यांमध्ये जोमाने उत्सव झाला नाही. हे वास्तव काही सांगून जातं.

आता राज्यात नवा मुद्दा चर्चेत आहे – त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्ती. मराठीवर लादला जाणारा दबाव पाहता उद्धव ठाकरे पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. याच मराठीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले – जुने मतभेद बाजूला ठेवत.


🪔 मराठीसाठी एकत्र आलेले ठाकरे – नवी दिशा

प्रबोधनकार ठाकरे यांचे वारस आणि शिवरायांचे दुर्गप्रेमी पुत्र, हे दोघं मराठीच्या रक्षणासाठी एकत्र आलेत हे मोलाचं आहे. या एका मुद्द्यावरूनच महाराष्ट्रात पुन्हा एक  नवचैतन्य निर्माण होऊ शकतं.

आज मराठी भाषेसाठी, अस्मितेसाठी लढणाऱ्या प्रत्येक पत्रकार, साहित्यिक, शिक्षक, नागरिकांनी या लढ्यात सहभागी व्हायला हवं. कारण:

“छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराची भाषा टिकवण्यासाठी लढणारा प्रत्येकजण योद्धा असतो.”


🎉 उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

शिवरायांच्या प्रेरणेने गड-किल्ल्यांतून प्रवास करणारा छायाचित्रकार, जनतेशी थेट संवाद करणारा मुख्यमंत्री, संकटात संयम राखणारा नेता आणि आजही मराठीसाठी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता – उद्धव ठाकरे हे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळी ओळख आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा…
त्यांच्या नेतृत्वाला, धैर्याला आणि मराठी प्रेमाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.


धाराशिव बसस्थानकातील लाचप्रकरणी विभागीय स्थापत्य अभियंता रंगेहाथ अटक

धाराशिव – शहरातील बसस्थानक जागा ताब्यात देण्यासाठी आणि कँटीनच्या शटरविषयी तडजोड करून लाच स्वीकारणाऱ्या विभागीय स्थापत्य अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (लाप्रवि) पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सोमवार, २२ जुलै रोजी करण्यात आली.

तक्रारदार गुत्तेदार असून, त्यांना धाराशिव बसस्थानकात वाहनतळ जागा वाटप करण्यात आली होती. सदर जागेचा ताबा देण्यासाठी आणि बाजूच्या कँटीनच्या पार्किंगकडील शटरबाबत लाच मागणी केल्याचा आरोप विभागीय स्थापत्य अभियंता शशिकांत अरुण उबाळे (वय ४९, रा. अंत्रोळीनगर, होडगी रोड, सोलापूर) यांच्यावर आहे.

या प्रकरणात तक्रारदाराने दिनांक १८ जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पडताळणी केली असता, आरोपीने पंचांसमक्ष डी.सी. साहेबांसाठी ५ हजार रुपये आणि स्वतःसाठी ४ हजार रुपये अशी एकूण ९ हजार रुपयांची लाचेची मागणी करून स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिटने २२ जुलै रोजी सापळा रचून धाराशिव बसस्थानकाच्या आवारात आरोपी शशिकांत उबाळे यांना तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ९ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून लाच रक्कमेसह मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

या कारवाईनंतर आरोपीच्या सोलापूर येथील घराची झडती घेण्यासाठी लाप्रवि पथक तात्काळ रवाना झाले असून, झडतीची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना अटक करून पुढील तपास केला जाणार आहे.

या प्रकरणी आरोपीचा मोबाईलही ताब्यात घेण्यात आला असून त्याचे डिजिटल विश्लेषण करून अधिक माहिती घेतली जाणार आहे. आरोपीवर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयातील मा. महाव्यवस्थापक (बांधकाम) यांच्याकडे आहेत.

सदर सापळा कारवाई पोलीस निरीक्षक विजय वगरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. यामध्ये पोलीस अंमलदार नरवटे, तावसकर, हजारे, काझी यांचा समावेश होता. संपूर्ण कारवाईला पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे (लाप्रवि, संभाजीनगर परिक्षेत्र), अपर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे आणि पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

घरफोडी प्रकरणात सराईत चोर गजाआड; दोन तोळे आठ ग्रॅम सोने जप्त

धाराशिव शहरातील घरफोडी प्रकरणातील सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत त्याच्याकडून दोन तोळे आठ ग्रॅम वजनाचे, 2 लाख 52 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलिस ठाणे धाराशिव शहर येथे दाखल असलेल्या गुन्हा क्र. 346/2025 भा.न्या.सं. कलम 331(4), 305 अन्वये घरफोडी प्रकरणात तपास सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, आणि इतर कर्मचारी यांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. आयकर युनिटचे सपोनि सुधीर कराळे, पोउपनि चंद्रकांत सावंत, आणि पोह. मनोज जगताप यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारे परसु लक्ष्मण चव्हाण, रा. जुना बसडेपो पाठीमागे, पारधी पिढी, धाराशिव याला शिवाजी चौकात अटक करण्यात आली. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या घरफोडी प्रकरणात त्याचा चुलता दत्ता बाबु चव्हाण सहभागी असल्याचेही त्याने सांगितले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून तेच मुद्देमाल असल्याची कबुली आरोपीने दिली. दागिने विकण्यासाठी तो बाहेर पडल्याचेही त्याने सांगितले.

गुन्ह्याचा तपास आणि मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादी आजीमोद्दीन उमराव शेख यांनी मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आभार मानले आहेत. या प्रकरणामुळे ‘पोलीस काही करत नाहीत’ हा गैरसमज दूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली. या पथकात सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, आयकर युनिटचे सुधीर कराळे, पोउपनि चंद्रकांत सावंत, पोह. विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोना बबन जाधवर, पोह. मनोज जगताप, चालक महेबुब अरब, पोअं. प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे यांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शौचालयाचे बांधकाम अवैध ठरणार! नगर रचना विभागाचा अभिप्राय नाही!!

धाराशिव – जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेशद्वारावर असलेले शौचालयाचे बांधकाम अवैध असल्याबाबत याबाबत दैनिक जनमत ने यापूर्वी बातमी प्रसिद्ध केली आहे. 2015 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमी अभिलेख विभागाकडून रस्त्याच्या सीमा निश्चित केलेल्या आहेत या सीमा ओलांडून हे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम अतिक्रमणात सुरू आहे. याबाबत उपविभागीय अभियंता पी. डी. मोरे यांना माहिती नाही. बांधकाम नियमानुसार होत असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले आहे. मात्र हे बांधकाम करताना आणखी एक महत्वाचा नियम असल्याचे बोलले जाते तो म्हणजे नगर रचना विभागाचा अभिप्राय. शासकीय विभागांना बांधकाम करताना नगर रचना विभागाचा अभिप्राय घेणे आवश्यक आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने असा कुठलाच अभिप्राय नसल्याचे किंवा त्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार झाला नसल्याचे प्रताप पवार यांनी दैनिक जनमतशी बोलताना सांगितले. तब्बल 60 लाख खर्चून हे बांधकाम होत असताना नियम धाब्यावर बसवले जात आहेत किमान याची निःपक्ष चौकशी होणे क्रमप्राप्त असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असेल तर हा निधीचा अपव्यय आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच अतिक्रमण आणि नियम डावलून बांधकाम सुरू असेल तर पारदर्शकतेची अपेक्षा कोणाकडून ठेवायची हा प्रश्न आता विचारला जात आहे.