तुळजापूर–लातूर महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपूलाचे काम अखेर सुरू झाले असले, तरी या कामासाठी लागणाऱ्या मुरुमाचा उगमच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुरुम उत्खनन करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार कंपनीने बांधकामासाठी लागणारा मुरुम काक्रंबा परिसरातील शेतजमिनी व ओसाड भूखंडांमधून बेकायदेशीरपणे उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने चालणाऱ्या या उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल ढासळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतजमिनींचे नुकसान, धुळीचे साम्राज्य, आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम हे या प्रकाराचे गंभीर दुष्परिणाम ठरत आहेत.
शासनाचा महसूल बुडवून विकासकामे केली जात असतील तर ती टिकाऊ व कायदेशीर कशी राहतील, असा सवाल उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने संबंधित मुरुमाचा मूळ स्रोत शोधून, उत्खननास परवानगी आहे का याची चौकशी करणे गरजेचे ठरत आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि बांधकाम साहित्य कायदेशीर व पर्यावरणपूरक मार्गानेच प्राप्त करण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा उड्डाणपूल गरजेचा आहेच, पण तो पर्यावरण व नियमांचे उल्लंघन करून झाला, तर तो विकास न ठरता विनाश ठरू शकतो.