धाराशिव जिल्हा परिषद ‘100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत’ अव्वल; QCI पथकाकडून अंतिम मूल्यमापन

0
30

धाराशिव – दि. 23 एप्रिल 2025: महाराष्ट्र शासनाच्या ‘100 दिवसांच्या क्षेत्रीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे’ अंतर्गत धाराशिव जिल्हा परिषदेने छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील मूल्यमापनासाठी भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) च्या पथकाने आज, दि. 23 एप्रिल 2025 रोजी धाराशिव जिल्हा परिषदेस भेट देऊन कामकाजाचे सादरीकरण तपासले.

मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विशेष मोहिमेचा कृती आराखडा दि. 07 जानेवारी 2025 ते दि. 16 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यभर राबविण्यात आला. धाराशिव जिल्हा परिषदेने आपले अंतिम सादरीकरण दि. 18 एप्रिल 2025 रोजी ई-मेलद्वारे विभागीय आयुक्तांना सादर केले होते. या सादरीकरणाच्या आधारे विभागीय आयुक्तांनी धाराशिव जिल्हा परिषदेला विभागातील सर्वोत्तम जिल्हा परिषद म्हणून निवडून राज्यस्तरीय अंतिम मूल्यमापनासाठी शिफारस केली.

QCI चे पथकप्रमुख श्री. रामनंद शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील टीमने धाराशिव जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे सखोल मूल्यमापन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विलास जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. सूर्यकांत भुजबळ, तसेच इतर विभागप्रमुख, खातेप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मूल्यमापनादरम्यान धाराशिव जिल्हा परिषदेने आपल्या कार्यक्षमतेने आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांनी पथकाची प्रशंसा मिळवली. “जिल्हा परिषद पुढील काळातही निर्धार आणि उत्साहाने कार्यरत राहील आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवेल,” असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here