लाडकी बहीण योजनेत कुठलाही बदल नाही, सरकारकडून कोणतीही वसुली नाही – राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांचे स्पष्टीकरण

0
36

नागपूर, १५ एप्रिल २०२५: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींमध्ये गोंधळ व अफवा पसरवण्याचा विरोधक प्रयत्न करत असून, योजनेच्या अटींत किंवा शासन निर्णयात आजपर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट विधान राज्याचे राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, “या योजनेची सुरुवात महायुती सरकारच्या कार्यकाळात करण्यात आली होती. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना प्रतिमाह रुपये १,००० देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज भरले आणि गर्दी होऊ नये म्हणून शासनाने उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी रेशन कार्ड, बीपीएल यादी अथवा अन्य आर्थिक दुर्बलतेचे पुरावे ग्राह्य धरले.”

गोंधळ माजवणाऱ्यांना चपराक

जैस्वाल म्हणाले, “जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा काही विरोधकांनी ही योजना ‘खैरात’ आहे, असे सांगत ती फसणार असल्याचे वक्तव्य केले. परंतु आज लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय. आणि आज त्याच लोकांच्या पोटात दुखत आहे.”

त्यांनी स्पष्ट केले की, “कोणत्याही लाभार्थी महिलेकडून वसुली करण्यात आलेली नाही. अपात्र ठरलेल्या महिलांनी स्वेच्छेने योजना सोडली आहे. सरकारने कोणत्याही महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही. ही योजना पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने राबवली जात आहे.”

शासन निर्णयात कोणताही बदल नाही

विरोधकांकडून २१०० रुपये देण्याचे आश्वासन आता फक्त ५०० रुपये मिळत असल्याच्या अफवांवरही त्यांनी उत्तर दिले. “मुळ शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल झाला नाही आहे. शासनाच्या महसुली उत्पन्नात वाढ होत आहे. उत्पन्न वाढल्यानंतर त्याचे योग्य विनियोजन करून शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व वचने टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अर्थ खात्याचे सहकार्य आणि इतर योजना

“अर्थ खात्याकडून सहकार्य नाही, असा आरोप चुकीचा आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात इतिहासात प्रथमच इतक्या लोकाभिमुख योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. धानाला बोनस असो, तीर्थदर्शन योजना असो किंवा युवांसाठीच्या योजना – सर्व योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

शिक्षण खात्यातील अपात्र शिक्षक प्रकरण

नागपूरच्या उपसंचालक कार्यालयातील शिक्षण घोटाळ्याबाबत त्यांनी सांगितले की, “सखोल चौकशी सुरू आहे. पात्र आणि अपात्र शिक्षकांची शहानिशा करूनच निर्णय घेतले जातील.”

राज्यमंत्री जैस्वाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, “लाडकी बहीण योजनेच्या नावावर कुठलाही खोटा प्रचार, अफवा किंवा राजकीय गोंधळ निर्माण करू नये. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सरकार जनहितासाठी कटिबद्ध असून, प्रत्येक वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here