धाराशिव –
आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये १०० टक्के मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ ( भाग – २) मधील नियम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/ आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे कर्नाटक विधानसभा क्षेत्रांमध्ये दिनांक १० मे, २०२३ रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणूकीमध्ये कर्नाटक राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या (सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड) जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. तथापि, त्यांची नावे कर्नाटक राज्यांतील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने आदेश दिले आहेत.
1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार / अधिकारी / कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
1) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)
II) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.
(IV) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत.