मुंबई – २०२४ च्या लोकसभा निवडणुका जस जश्या जवळ येत आहेत तसे राजकारण देखील बदलू लागले आहे. महाराष्ट्रात भाजपचे मिशन ४५ सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत वंचित बहुजन आघाडी संदर्भात मोठे वक्तव्य आजच्या पत्रकार परिषदेत केले आहे.
आम्ही ३५ ते ४० जागा जिंकू, काही प्रमुख लोकं शिवसेना आणि महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत ती गणितं बदलणार आहेत. किमान ४० जागा लोकसभेच्या जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच भाजपच्या मिशन ४५ वर टीका करताना त्यांनी भाजप देशात १ हजार जागा जिंकेल आणि राज्यात १४८ जागा जिंकेल असा उपरोधिक टोला लगावला.भाजप हवेतला पक्ष आहे. जो पक्ष मिंधे आणि अजित पवार दोन कुबड्यांवर उभा आहे त्यांनी ४५ जागा जिंकण्याची भाषा करावी हे हास्यास्पद असल्याचे ते यावेळी म्हणाले.
बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू
बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेत फरक नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने पुढे जाणारे त्यांचे नातू आहेत. या देशामध्ये संविधान टिकावं , या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये, या देशातला कायदा पायदळी तुडवला जाऊ नये, या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. आमची आणि त्यांची जी चर्चा होतेय ती अत्यंत सकारात्मक होतेय आणि ती चालू आहे, लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत. २८ डिसेंबर नंतर जी बैठक होणार आहे ती निर्णायक बैठक होईल, प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्यामुळे हुकुमशाहीचे हात बळकट होतील. शिवसेनेच्या बरोबरीने महाराष्ट्रामध्ये मोदींच्या हुकूमशाहीवर हल्ले करत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.