Home Blog Page 17

धाराशिवमध्ये समाजासाठी प्रेरणादायी पाऊल – दोन मृत व्यक्तींचे यशस्वी देहदान

धाराशिव | ७ ऑगस्ट २०२५:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे आज दोन मृत व्यक्तींच्या देहांचे यशस्वीपणे देहदान करण्यात आले. या समाजहिताच्या कार्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्राला मोलाची मदत होणार असून, इतरांसाठीही एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.

पहिले देहदान कै. श्री. सुभाष काशिनाथ सूर्यवंशी (वय ७५, सोलापूर – सेवानिवृत्त शिक्षक) यांचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन मुलांनी नितीन व सऺतोष सूर्यवंशी यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेञ नानीजधाम ता.जि.रत्नागिरी, यांच्या प्रेरनेने देहदानाची इच्छा व्यक्त केली.

दुसरे देहदान कै.श्रीमती सिताबाई बापुराव रणदिवे (वय ७०) यांचे करण्यात आले. त्यांचे चुलत नातु दत्ता रणदिवे व उपसरपऺच सतिष खराटे याऺनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित राहून देहदानासाठी पुढाकार घेतला.

या दोन्ही देहांचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी उपयोग करण्यात येणार आहे. शरीररचना विभागाच्या नियोजनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. या कार्यात डॉ. स्वाती पाऺढरे (प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरीररचना विभाग), डॉ. सुवर्णा आनंदवाडीकर (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. तानाजी लाकाळ (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. विश्वजीत पवार (प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र), श्री. प्रशाऺत बनसोडे, श्री. पंकज कसबे प्रयोगशाळा तऺञज्ञ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

संपूर्ण प्रक्रियेसाठी मार्गदर्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेऺद्र चौहान यांचे लाभले. त्यांनी देहदान करणाऱ्या कुटुंबीयांचे विशेष आभार मानले आणि हे कार्य वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व प्रशिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.

देहदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असून समाजातील इतरांनीही याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

महसूलमंत्र्यांना 350 निवेदने; प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर महसूलमंत्र्यांचे ताशेरे

पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा


धाराशिव, दि. 7 ऑगस्ट 2025: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धाराशिव दौऱ्यात जनता दरबारात तब्बल 350 निवेदने मिळाली. याबाबत त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करताना इतक्या मोठ्या संख्येने निवेदने येणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह असल्याचे सांगत ताशेरे ओढले. तहसीलदारांनी आठवड्यातून दोन गावांना भेटी देऊन दोन ते अडीच तास जनतेशी संवाद साधावा आणि स्थानिक पातळीवरच लोकांच्या समस्या सोडवाव्यात, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाचे आव्हान स्वीकारले आहे. यासाठी प्रत्येक तहसीलदाराने सहा महिन्यांचा गाव भेटींचा कार्यक्रम जाहीर करावा आणि त्याचे फोटो, रील्स व अहवाल महसूल खात्याच्या वेबसाइटवर अपलोड करणे बंधनकारक असेल, असे ते म्हणाले. “जर तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकारी यांनी मनावर घेतले, तर माझ्याकडे एकही तक्रार येणार नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
महसूलमंत्र्यांनी जिवंत सातबारा मोहिमेवर विशेष भर दिला. यामध्ये मृत व्यक्तींची नावे सातबारावरून कमी करणे, नाल्यावरील आणि रस्त्यावरील अतिक्रमणे हटवणे, सरकारी जमिनीवरील शर्तभंग प्रकरणे निकाली काढणे यांचा समावेश आहे. शेत रस्ते आणि शेतीच्या सीमांचे वाद सोडवण्यासाठी 17 सप्टेंबर (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस) ते 2 ऑक्टोबर (राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती) या कालावधीत राज्यभर विशेष मोहीम राबवली जाईल. या मोहिमेत शेतातच ‘अदालत’ घेऊन सीमांकन केले जाईल आणि सीमांवर 10 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबवला जाईल. “झाड तोडणाऱ्यांवर वन आणि पोलिस खात्याची कडक कारवाई होईल,” अशी ताकीद त्यांनी दिली. शेतकऱ्यांना पीक कर्ज, बी-बियाणे आणि कृषी वीज सवलतींसाठी ग्रीक नोंदणी अनिवार्य असून, सध्या 72% शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 100% नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महसूल, ग्रामविकास आणि कृषी खात्याने संयुक्त मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचे लाभ ग्रीक नोंदणी क्रमांकाशिवाय मिळणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय गांधी योजनेच्या 20% लाभार्थ्यांना अशिक्षितपणामुळे किंवा डीबीटी प्रक्रियेत त्रुटींमुळे सहा महिन्यांपासून लाभ मिळाले नसल्याची बाब बावनकुळे यांनी निदर्शनास आणली. यासाठी तलाठ्यांनी प्रत्येक गावात जाऊन सुटलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांचा डीबीटी पूर्ण करावा, असे आदेश दिले. आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्यांशी संबंधित गोंधळ दूर करण्यासाठी तलाठ्यांनी गावात जाऊन लाभार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असेही ते म्हणाले. राज्यात प्रत्येक गावठाणाचे ड्रोन मॅपिंग करून प्रत्येक घराला स्वामित्व (प्रॉपर्टी कार्ड) देण्याचा कार्यक्रम 60% पूर्ण झाला आहे. आता धाराशिव शहरासह शहरी भागातही ही योजना राबवली जाणार आहे. “ग्रामीण भागात यशस्वी झालेला हा कार्यक्रम आता शहरांमध्येही लागू होईल,” असे बावनकुळे यांनी सांगितले.
महसूल खात्यात पारदर्शकतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जाणार आहे. तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना फेस अ‍ॅपद्वारे हजेरी नोंदवणे बंधनकारक असेल. येत्या तीन महिन्यांत संपूर्ण महसूल यंत्रणा फेस अ‍ॅपवर आणली जाईल. रोव्हर तंत्रज्ञानाद्वारे अचूक जमीन मोजणी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ऑनलाइन खरेदी-नोंदणी प्रक्रिया सुलभ केली जाईल. “रोव्हर मोजणीमुळे एक इंचाचा फरकही पडणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून कोणत्याही तालुक्याची नोंदणी करता येण्यासाठी ‘वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ प्रणाली लागू झाली आहे. पुढील तीन वर्षांत ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ आणि आधार कार्डशी जोडलेली फेसलेस नोंदणी प्रणाली लागू होईल, अशी घोषणा त्यांनी केली.
घरकुल योजनेसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा आणि स्थानिक बांधकामासाठी तहसीलदारांनी वाळू उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय अंमलात आहे. खासगी बांधकामांसाठी 500 रुपये प्रति ब्रास रॉयल्टी आकारली जाईल. यासाठी तहसीलदारांना सक्रियपणे काम करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्याचे वार्षिक महसूल सध्या 1 लाख कोटी रुपये असून, यापूर्वी ते 75 हजार कोटी रुपये होते. कर्जाचा मुद्दा स्वतंत्रपणे हाताळला जात असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल खात्याच्या कामांना गती देण्यासाठी कन्सल्टन्सी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती कार्यरत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. यासाठी पॅरामीटर्स निश्चित केले जाणार आहेत. “आम्ही निवडणुकीत दिलेला संकल्प पाच वर्षांसाठी आहे. सात महिन्यांतच आम्ही यावर काम सुरू केले आहे,” असे बावनकुळे म्हणाले. इनाम जमिनी आणि तुकडेबंदी कायद्याशी संबंधित समस्यांसाठी लवकरच एस ओ पी तयार केला जाईल. अनधिकृत बांधकामांना कायदेशीर संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील काळात तुकडेबंदी कायद्याचा गैरवापर रोखला जाईल.
महसूल अधिकाऱ्यांनी आपले काम सोशल मीडियावर रील्स, फोटोद्वारे प्रसिद्ध करावे आणि वृत्तपत्रांतील चुकीच्या बातम्यांचे तातडीने खंडन करावे, असे निर्देश देण्यात आले. “आमचे काम चांगले आहे, पण त्याची प्रसिद्धी होत नाही. यापुढे प्रत्येक तहसीलदाराने आपले काम वेबसाइटवर अपलोड करावे,” असे बावनकुळे यांनी सांगितले. शाळेचे दाखले 48 तासांत मिळावेत आणि 500 रुपये स्टॅम्प पेपर मोफत देण्याचा शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित बढत्यांसाठी तातडीने कारवाई केली जाईल. दैनंदिन तक्रारींसाठी टाइमलाइन निश्चित करून त्यांचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले. “महसूलमंत्र्यांकडे तक्रारी येण्याऐवजी स्थानिक पातळीवरच त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत,” असे त्यांनी ठासून सांगितले.
“पुढील तीन वर्षांत महसूलमंत्र्यांकडे एकही तक्रार येणार नाही, असा जिल्हा निर्माण करायचा आहे,” असे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट बावनकुळे यांनी जाहीर केले. यासाठी प्रत्येक आठवड्याला चार जिल्ह्यांचे दौरे करून आणि लोकशाही दिनाचे आयोजन करून तक्रारींचा निपटारा केला जाईल. “महसूल खाते समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी आहे. वर्षानुवर्ष चाललेले जमिनीचे वाद आणि गैरसमज आम्ही दूर करू,” असे त्यांनी आवर्जून सांगितले. या सर्व उपाययोजनांमुळे महसूल खाते अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा धाराशिव जिल्हा दौरा कार्यक्रम निश्चित

धाराशिव| प्रतिनिधी

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ६ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान विविध शासकीय आढावा बैठकांना उपस्थिती, नागरीकांच्या निवेदने स्विकारणे, पत्रकार परिषद तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभाग यांचा समावेश आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवार, दिनांक ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण करतील. तेथून इंडिगोच्या विमान क्र. ६ई-५०२७ ने सायं. ७.२५ वा. छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करून रात्री ८.२५ वाजता आगमन करतील. त्यानंतर व्हीआयपी शासकीय विश्रामगृहात मुक्काम असेल.

गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० वाजता मोटारीने बीडमार्गे धाराशिवकडे प्रयाण होईल. सकाळी ११.३० वाजता धाराशिव येथे आगमनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या निवेदने स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर आढावा बैठक, मुद्रांक व नोंदणी विभागाचा आढावा, भूमी अभिलेख विभागाचा आढावा तसेच दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता तुळजापुरात आगमन करून आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील. त्यानंतर श्रीक्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यावरील कार्यक्रमात उपस्थित राहतील.

त्याच रात्री ७.३० वाजता ते पुन्हा धाराशिव शासकीय विश्रामगृहात मुक्कामी परततील.

शुक्रवारी, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ते मुरुम (ता. उमरगा) कडे प्रयाण करतील. ९.३० वाजता श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यात सहभागी होतील. तेथून पुढे ११ वाजता मोटारीने जालनाकडे रवाना होतील.

जालन्यात दुपारी ३.३० वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची निवेदने, आढावा बैठक, मुद्रांक व नोंदणी तसेच भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेतल्यानंतर सायं. ७.३० वा. पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता भाजपा कार्यालय, संभाजीनगर कॉलनी येथे पक्ष बैठकीस उपस्थिती लावून, ९ वाजता भोकरदनकडे प्रयाण करून रात्री १० वाजता तेथे मुक्काम करतील.

या दौऱ्याच्या निमित्ताने तीन जिल्ह्यांत महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व विकासकामांचा आढावा घेणे हाच मुख्य उद्देश असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

महसूल दिन भूम मध्ये अन् टाळे जिल्हाधिकारी कार्यालयात

धाराशिव – जिल्हा प्रशासनाच्या वतीने भूम येथे महसूल दिन आयोजित केला होता मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागांना टाळे दिसून आल्याने मुख्यालयी कामासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना शाखा, लेखा विभाग, अभिलेख कक्ष यांना चक्क टाळे पाहायला मिळाले तर काही विभागात शुकशुकाट होता. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमक्या किती कर्मचाऱ्यांना भूम येथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले याबाबत विचारणा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जावे तर त्याही भूम येथील कार्यक्रमाला गेल्या असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क शुकशुकाट होताच मात्र महिन्याचा पहिला सोमवार असताना लोकशाही दिन असताना प्रशासनातील प्रमुख अधिकारी नसल्याने कामानिमित्त आलेलेल नागरिक रिकाम्या हाताने परत निघून गेले. याबाबत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

उपविभागीय अधिकारी कार्यालयाला देखील टाळेच

धाराशिव उपविभागीय अधिकारी कार्यालयाची देखील अशीच अवस्था होती. कार्यालय बंद का आहे हे सांगायला देखील तिथे कोणीच नव्हते. जात प्रमाणपत्राची कामासह इतर शैक्षणिक कामासाठी तसेच इतर तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना केवळ बंद कुलुपाचे दर्शन झाले. किमान आवक जावक विभाग तरी चालू असायला हवा होता अशा प्रतिक्रिया रेंगाळत उभारलेल्या नागरिकांनी दिल्या.

सायबर फसवणुकीतील संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात धाराशिव सायबर पोलिसांना मोठे यश

क्रेडिट कार्डमधून १.९९ लाखांची ऑनलाईन खरेदी रद्द करून तक्रारदाराला पूर्ण रक्कम परत

धाराशिव, दि. २ ऑगस्ट –
सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन फसवणुकीतून चोरट्या पद्धतीने घेतलेल्या १,९९,०००/- रुपयांची संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात धाराशिव सायबर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक कौशल्य आणि तात्काळ कारवाई करत आरोपीने ऑनलाईन खरेदीसाठी वापरलेली ऑर्डर रद्द करून ही रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत पाठवण्यात यश मिळवले.

फसवणुकीची घटना

कळंब तालुक्यातील रहिवासी श्रीमती रिया निखिल अंधारे (वय २१), व्यवसायाने गृहिणी, यांना दिनांक २३ जुलै २०२५ रोजी व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘आरटीओ चलन’ या नावाची एक APK फाईल प्राप्त झाली. ही फाईल त्यांनी डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपीचे मेसेज येऊ लागले आणि काही क्षणांतच त्यांच्या क्रेडिट कार्डमधून १,९९,०००/- रुपये विथड्रॉल झाल्याचे मेसेज प्राप्त झाले.

सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करून NCCR पोर्टलवर क्र. ३१९०७२५०१२७२५३ अंतर्गत तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांची तत्पर कारवाई

तक्रार प्राप्त होताच धाराशिव सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली. फसवणूक झालेली रक्कम इन्फीबीम ॲव्हेन्यू या पेमेंट गेटवेमार्फत ड्राईव्ह ट्रॅक प्लस – HPCL या कंपनीकडे वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी ईमेल व दूरध्वनीद्वारे तात्काळ संपर्क साधला.

तपासात उघड झाले की, आरोपीने या रकमेचा वापर करून ऑनलाईन शॉपिंग केली होती. सायबर पोलिसांनी ती खरेदी थांबवण्याचा आणि ऑर्डर रद्द करून रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर सायबर पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्याने संबंधित ऑनलाईन खरेदीची ऑर्डर रद्द करण्यात आली आणि संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत केली गेली.

पोलिसांची टीम आणि मार्गदर्शन

ही संपूर्ण कारवाई  पोलीस अधीक्षक शफकत आमना  यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चोरमले, सपोनि कामुळे, पोउनि सर्जे, सफौ कुलकर्णी, पोहक. हालसे, मपोना पौळ, पोशि सुर्यवंशी, मोरे, तिळगुळे, कदम, काझी, शेख, खांडेकर, शिंदे, पुरी, अंगुळे, बिराजदार, गाडे, जाधवर आणि भोसले यांनी संयुक्तपणे केली.


1 ऑगस्टला जयंती 16 जुलै ला आठवण, सत्ता असतानाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पत्रप्रपंच

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भिजत घोंगडे

धाराशिव – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे राजकारण सुरू असून गतवर्षी त्यांच्या स्मारकासाठी जागा मिळून देखील वर्षभर स्मारक होण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले नाहीत मात्र जयंती जवळ आल्याने विचारणा होईल म्हणून जयंतीच्या तोंडावर जागा विनाशुल्क देण्याचे पत्र तुळजापुरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी महसूलमंत्र्यांना दिल्याने सरकारने आणि प्रशासनाने हे स्मारक होण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
1 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे स्मारकासाठी दूध संघाची 1 एकर जागा देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय काढला तो काढल्यानंतर वेगाने हालचाल अपेक्षित होती, नगरपालिकेवर प्रशासक म्हणजे सरकारची सत्ता असताना त्याबाबत वर्षभरात कुठलीच कार्यवाही झाली नाही. स्मारक व्हावे म्हणून आ. कैलास पाटील यांनी विधानसभेत 2023 मध्ये आवाज उठवला होता त्यानंतर स्मारक मंजूर देखील झाले. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी 16 जुलै 2025 रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिले त्यात त्यांनी नळदुर्ग येथे महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी आणि धाराशिव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या जागेसाठी नगरपरिषदांकडे निधी नसल्याने त्याचे मूल्यांकन माफ करावे असे पत्र लिहिले. सत्ताधाऱ्यांनी पाठपुरावा केला याबाबत दुमत नाही मात्र जयंती डोळ्यासमोर ठेऊन पत्र आणि निवेदने सादर केली जात असतील ते देखील सत्ता असताना तर त्याला गतिमानता म्हणावी का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या पत्रावर अवर सचिव महसूल आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांना तत्काळ प्रस्ताव करण्याचे निर्देशित केले असले तरी उद्या जयंती असताना कुठल्याच हालचाली दिसत नाहीत मात्र पत्रप्रपंच न होता तातडीने स्मारकावर काम करण्याची नागरिकांची मागणी आहे. स्मारकासाठी जागा मंजूर झाली त्या शासन निर्णयामध्ये मूल्यांकन करून संबंधित शासन यंत्रणेकडून ती रक्कम वसुली करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आहेत. यानिमित्ताने धाराशिव नगरपालिका निधी भरण्यास सक्षम नसेल तर प्रशासक काळात नगरपालिकेतील पैसा नेमका गेला कुठे? अनाठायी कामासाठी निधी वापरला गेला का? त्याला प्रशासक जबाबदार की सरकार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत.

भुम शहरात ३१ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी लागू — आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय


धाराशिव | ३० जुलै २०२५
भुम शहरातील आण्णाभाऊ साठे नगर परिसरात ३१ जुलैपासून ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भुम शहरात दरवर्षीप्रमाणे मातंग समाजातर्फे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येते. मात्र यंदा मातंग समाजाचे तीन गट समाज मंदिरासमोरच कार्यक्रम घेण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने त्यांच्यात मतभेद व तणाव निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने सर्व गटांना समजावून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले होते, परंतु ते निष्फळ ठरल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली.

या पार्श्वभूमीवर, पोलीस निरीक्षक, भुम यांच्या शिफारसीनुसार व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, ३१ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आण्णाभाऊ साठे नगरमधील मातंग समाज मंदिराच्या ३० मीटर परिघात चार किंवा अधिक लोकांच्या जमावावर बंदी घालण्यात आली आहे.

कोणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

हा आदेश आज, ३० जुलै रोजी अधिकृतरित्या लागू करण्यात आला असून तो संबधित परिसरात लागू राहील.


श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी समिती गठीत – उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई / तुळजापूर :
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर द्वारा संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय ३० जुलै २०२५ रोजी जारी केला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार, संस्थेच्या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून शासकीय तत्त्वावर महाविद्यालय हस्तांतरित करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय दृष्टीने योग्य निर्णय घेणे हे समितीचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

समितीचे सदस्य खालीलप्रमाणे आहेत :

  1. श्री किरण लाढाणे – प्रादेशिक सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग, छ. संभाजीनगर – अध्यक्ष
  2. डॉ. स्मिता कोकणे – मुख्य लेखा व भांडार पडताळणी अधिकारी, तंत्रशिक्षण संचालनालय – सदस्य
  3. श्री अरविंद बोळंगे – तहसीलदार, तुळजापूर व विश्वस्त सदस्य – सदस्य
  4. डॉ. संजय डंभारे – प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छ. संभाजीनगर – सदस्य
  5. श्री रविंद्र आडेकर – प्र. प्राचार्य, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय – सदस्य सचिव

समितीचे कार्य आणि उद्दिष्टे :

या समितीला महाविद्यालयाच्या जागेची स्थिती, भौतिक पायाभूत सुविधा, बांधकाम, मनुष्यबळ, आर्थिक भार, यंत्रसामुग्री, उपकरणे, कागदपत्रे आणि इतर सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करणे अपेक्षित आहे.

  • प्रस्तावित अहवाल ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
  • AICTE (अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद) व विद्यापीठाच्या निकषांनुसार सर्व माहिती एकत्रित करून नियोजन केले जाईल.
  • संस्था हस्तांतरणासाठी आवश्यक त्या कायद्याच्या प्रक्रिया, जमिनीचे हक्कदस्तावेज, बांधकाम परवाने, कर्मचारी हस्तांतरण, तसेच आर्थिक नियोजन या सर्व बाबींचा समावेश प्रस्तावित अहवालात करण्यात येईल.

शासनाची पुढील कार्यवाही :

या अहवालाच्या आधारावर शासन व ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार (MoU) होणार असून, अंतिम निर्णयानंतर संबंधित प्राधिकरणांमार्फत संस्था शासकीय स्वरूपात कार्यान्वित होईल. यामुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा, आर्थिक मदत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक पाऊल

शासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खासगी संस्थांतील अडचणी, आर्थिक तंगी, अनियमितता यावर उपाय म्हणून शासनाचे नियंत्रण येणे ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

तुळजापूरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे पाऊल शैक्षणिक प्रगतीची संधी निर्माण करणारे ठरणार आहे.

धाराशिव शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था; नागरिकांचा संताप शिगेला

 7 ऑगस्ट रोजी रास्ता रोकोचा इशारा!

धाराशिव –

 धाराशिव शहरातून जाणाऱ्या बार्शी-औसा राज्यमार्ग व जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान मंदिर या दोन्ही प्रमुख रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. संबंधित यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी 7 ऑगस्ट रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शहरातील बार्शी ते औसा हा राज्यमार्ग, जो जिजाऊ चौक ते भवानी चौक सांजा रोडपर्यंत जातो, सध्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. या मार्गालगत शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, शासकीय कार्यालये असल्यामुळे प्रचंड वर्दळ असते. मात्र रस्त्यावर पावसाचे पाणी साचून खडी उखडली असून, खड्ड्यांमुळे अनेकजण अपघातग्रस्त होत आहेत. दुर्दैवाने एका तरुणाचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक कायमचे अपंग झाले आहेत.

विशेष म्हणजे या रस्त्याच्या काम महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (मुंबई) यांच्यामार्फत ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी कंत्राटदाराशी करार करून मंजूर झाले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी भूमिपूजनही केले होते. परंतु या कामाला नऊ महिने झाले तरी अद्याप सुरुवात झालेली नाही. वाहनचालकांना मणक्याचे विकार जडत आहेत, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे व मानसिक त्रास वाढला आहे.

त्याचप्रमाणे, जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान मंदिर (नितीन आदमिले ते लाटे घर) हा सीसी रस्ता २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नगर परिषदेने मंजूर करून कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिलेला आहे. हे काम ३०० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित होते, पण साडेतीन वर्षांनंतरही काम सुरू झालेले नाही. या रस्त्याची अवस्था सुद्धा भयावह असून नागरिकांना तेच हाल सहन करावे लागत आहेत.

या दोन्ही रस्त्यांच्या कामांना तातडीने सुरुवात करावी, अन्यथा ७ ऑगस्टपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा खालील नागरिकांनी दिला आहे

   या निवेदनावर शहाजी भोसले, प्रशांत पाटील, विनोद वीर, दौलत निपाणीकर, संतोष हंबीरे, रवी वाघमारे, शेखर घोडके, उमेश राजेनिंबाळकर, रोहित बागल, सोमनाथ गुरव, सिद्धार्थ बनसोडे, बाबा मुजावर, तुषार निंबाळकर, मिनिल काकडे, आदित्य पाटील, अभिराज कदम, राणा बनसोडे, महादेव माळी, शौकत शेख, राकेश सुर्यवंशी, बंडू आदरकर, पंकज पाटील, सुमित बागल, पंकज भोसले, धवलसिंह लावंड, अभिषेक बागल, अक्षय खळदकर, नाना घाटगे, अमित उंबरे, जयंत देशमुख, सुरज वडवले, सह्याद्री राजेनिंबाळकर, ॲड. तनुजा हेड्डा, मनोज उंबरे, कालिदास शेरकर, प्रदीप घुटे, विजय माकरवार, दत्तात्रय गोरे, शेषेराव दुधनाळे, एम.बी. बनजगोळे, वैजीनाथ नरुणे, प्रेमानंद सपकाळ, ऋषी राऊत, अजिंक्य हिबारे, सतीश लोंढे, विनोद केजकर, शहाजी पवार, अतुल खराडे, हर्षद ठवरे, तौफिक काझी, अबरार कुरेशी, सात्विक दंडनाईक आदी नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण प्रकरण उघडकीस : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यशस्वी कारवाई, तीन आरोपींना अटक

धाराशिव, – पुण्यातून अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीची सुटका करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. ही कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पो.ह. विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पो.ना. बबन जाधवर व चालक पो.ह. महेबुब अरब यांच्या पथकाने ही कारवाई केली.

घटनाक्रम असा की, पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपूर्वी एका दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची माहिती पो.उ.नि. निलेश मोकाशी यांनी धाराशिव गुन्हे शाखेला दिली होती. त्यानंतर तपासदरम्यान तुळजापूर येथील सुनिल सिताराम भोसले व त्याच्या साथीदारांवर संशय आल्याने पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुरू केली.

तपासात समोर आले की, सुनिल भोसले (वय ५१, रा. तुळजापूर), शंकर उजण्या पवार (वय ४०, रा. हासेगाव, ता. लातूर) आणि शालुबाई प्रकाश काळे (वय ३५, रा. तुळजापूर) या तिघांनी पुण्यातून कोमल धनसिंग काळे (वय २ वर्षे) हिला अपहरण करून लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथे ठेवले होते.

पथकाने या तिघांना ताब्यात घेत अपह्रुत मुलीची सुखरूप सुटका केली. यानंतर सर्व आरोपी व मुलीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे येथील पो.उ.नि. निलेश मोकाशी व मपोअं डुकरे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही धाडसी व वेगवान कारवाई करत चिमुकलीला तिच्या कुटुंबाकडे सुखरूप परतवणाऱ्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.