Home Blog Page 12

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे करणार पाहणी

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून काही भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री  दत्तात्रय भरणे आज दि. 16 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

भरणे यांचा पुणे–इंदापूर–धाराशिव हा सुधारित दौरा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता इंदापूर येथून कुर्डुवाडी, बार्शी, येरमाळा मार्गे वाशी (जि. धाराशिव) कडे प्रयाण करतील.

दुपारी साडेतीन वाजता वाशी येथे आगमन करून शहर व लगतच्या परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी कृषिमंत्री करतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार राहुल भैय्या मोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव असलकर उपस्थित राहणार आहेत.

यानंतर सायं. साडेपाच वाजता भरणे वाशी येथून पुन्हा इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे प्रयाण करतील. रात्री 8 वाजता तेथे पोहोचून मुक्काम करतील.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी भरणे यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ईटकुर येथील वाशीरा नदीला महापूर मुसळधार पावसात ऊस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान,नुकसानीचे पंचनामे करा शेतकऱ्यांची मागणी

ईटकुर (बालाजी देसाई) : कळंब तालुक्यातील ईटकूर परिसरात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाशीरा नदीला महापूर आल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच वाशिरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतीवरील ऊस व सोयाबीन पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

ईटकूरसह गंभीरवाडी, बोरगाव धनेश्वरी गावात गुरुवारी मध्यरात्री संततधार पाऊस झाला. या पावसामध्ये ईटकुर- पारा रोडवरील तसेच ईटकूर- भोगजी रस्त्यावरील वाशीरा नदीला महापुर आल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतुक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती .रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत पाणीच पाणी साचल्याने अनेक गावांशी संपर्क तुटला होता. शुक्रवारी दुपारनंतर पाणी कमी झाल्याने वाहतूक सेवा सुरळीत सुरू झाली.

वाशिरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. यामुळे सोयाबीन तसेच ऊस पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तसेच या पुर परिस्थितीमुळे वाशीरा नदी काठच्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने मुक्या जनावरांना चांगलीच तारांबळ उडाली परंतू प्रसंगावधान ओळखून मुक्या जनावरांना पाण्यातून बाहेर काढल्याने कुठल्या ही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.

या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

  • घरांच्या पडझडीचे तलाठ्यांकडून पंचनामा
    गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर वाडी येथील शिवाजी तानाजी दनाणे यांच्या मातीच्या घराची पडझड झाली होती. या पडझडीची माहिती मिळताच गंभीरवाडी सज्जाचे तलाठी आकाश हजारे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.

आक्षेपांची सुनावणी न घेणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग – पालकमंत्री प्रताप सरनाईक

तुळजापूर विकास आराखड्याची बैठक आता 17 सप्टेंबरला

धाराशिव – तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आक्षेपांची सुनावणी न घेणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग असल्याची खंत पालकमंत्री तथा तुळजापूर विकास आराखडा समितीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी तुळजापूरचे स्थानिक नागरिक व पालकमंत्री यांच्यात बैठक झाली.

विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन स्थानिक नागरिकांना दाखवले गेले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना दिली. तसेच या विकास आराखड्यास किती लोकांची संमती आहे, याची माहिती लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देशही दिले.

स्थानिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिला.

पूर्वीही दिली जागा
तुळजापूर मंदिर विकासासाठी 1988 आणि 2012 मध्ये जागा दिली असून, त्यावेळी विरोध झाला नव्हता. मात्र आता आणखी किती जागा द्यायची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. मंदिराजवळील घरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याने त्यांना हेरिटेज दर्जा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

एकच आर्किटेक्ट का?
या आराखड्यासाठी हेमंत पाटील हेच आर्किटेक्ट असल्याचे, आणि ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ऐकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पहिल्या आराखड्यात आमची घरे नव्हती, मात्र दुसऱ्या व तिसऱ्या आराखड्यात ती दाखवली गेली, हे संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बैठकीचे निरोप मिळाले नाहीत
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याचे आठवडाभर आधी ठरले होते. मात्र बाधित नागरिकांना त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याबाबत तहसीलदार उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आता 17 सप्टेंबरला बैठक
तुळजापूर विकास आराखड्याबाबत आता 17 सप्टेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत मार्ग निघतो की नागरिकांचा विरोध कायम राहतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

करजखेडा दुहेरी हत्याकांडातील आरोपी पुण्यात पकडले; २४ तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेची  कारवाई


धाराशिव, दि. १४ ऑगस्ट – धाराशिव जिल्ह्यातील करजखंडा (ता. धाराशिव) येथील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना केवळ २४ तासांच्या आत जेरबंद करण्याची धडाकेबाज कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक  शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस ठाणे बेंबळी हद्दीत गुरनं २०९/२०२५ भादंवि कलम १०३, ३(५) बीएनएस अंतर्गत नोंद झालेल्या संवेदनशील दुहेरी हत्याकांडानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सचिन खटके, पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोना. बबन जाधवर, अशोक ढगारे, चापोह. विजय घुगे आणि महेबुब अरब हे पथक रवाना झाले.

दरम्यान, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी –

  1. जीवन हरीबा चव्हाण
  2. हरीबा यशवंत चव्हाण
    हे दोघे पुण्यातील नातेवाईकांच्या घरी आश्रयाला गेले असल्याचे कळाले. तातडीने वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाने सरकारी वाहनांद्वारे पुण्याकडे रवाना होऊन जनता वसाहत, पर्वती पायथा येथे छापा टाकला. अत्यंत शिताफीने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव येथे आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना रिपोर्टसह पोलीस ठाणे बेंबळी येथे सुपूर्द करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई  अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा; नोंदणी व नुतनीकरण शुल्क पूर्णतः निःशुल्क

मुंबई, दि. १३ ऑगस्ट :
राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नुतनीकरण करताना आकारले जाणारे शुल्क आता पूर्णपणे निःशुल्क करण्यात आले आहे.

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने आज (१३ ऑगस्ट २०२५) जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, यापूर्वी बांधकाम कामगारांकडून नोंदणी व नुतनीकरणासाठी रु. २५ शुल्क आकारले जात होते. शासनाच्या २०२२ मधील आदेशानुसार ते कमी करून रु. १ करण्यात आले होते. मात्र, बांधकाम कामगारांच्या मागण्या आणि मंडळाच्या शिफारसी लक्षात घेऊन आता हे शुल्कही रद्द करून नोंदणी व नुतनीकरण प्रक्रिया पूर्णपणे शुल्कमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंडळाच्या कल्याणकारी योजना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ अंतर्गत करण्यात आली आहे. राज्यातील नोंदणीकृत व सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांसाठी मंडळामार्फत २९ विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य विषयक योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना आणि इतर योजनांचा समावेश आहे.

प्रक्रिया अधिक सुलभ

सन २०२० पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण आणि लाभवाटप प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. शुल्क रद्द झाल्याने नोंदणीसाठी कोणताही आर्थिक अडथळा राहणार नाही, तसेच नवीन कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सुलभता मिळेल.

थेट फायदा हजारो कामगारांना

हा निर्णय लागू झाल्याने राज्यभरातील हजारो बांधकाम कामगारांना थेट आर्थिक दिलासा मिळेल. कमी उत्पन्न असलेल्या कामगारांना नोंदणीसाठी पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही, तसेच मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग अधिक खुला होईल.

कामगार संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत शासनाचे आभार मानले असून, हा उपक्रम कामगारांच्या सामाजिक सुरक्षेला आणि कल्याणाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

घरफोडीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; २.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

धाराशिव – कळंब शहरातील घरफोडी प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत गजाआड करत मोठी कामगिरी बजावली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २,२४,२९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि.) सुदर्शन कासार यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान पोस्ट कळंब हद्दीत गुप्त बातमीवरून आरोपीचा शोध सुरू केला. गुप्त माहितीप्रमाणे, संशयित आरोपी दिगंबर संदिपान काळे (वय २५, रा. आंदोरा, ता. कळंब, जि. धाराशिव) याने कळंब परिसरात घरफोडी करून चोरी केलेला मुद्देमाल आपल्या घराजवळील शेतात लपवून ठेवला होता.

पोलिसांनी तत्काळ आरोपीस ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून प्राथमिक चौकशी केली असता त्याने कळंब येथील निखिल एंटरप्राइजेस या दुकानात घरफोडी केल्याची कबुली दिली. याबाबत पोस्टे कळंब येथे आधीच गुन्हा क्रमांक २८०/२५ अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंद असल्याची पुष्टी झाली.

यानंतर पोलिसांनी पंचनामा करून नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल —

  • २,२४,२९८ रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य
  • २,००० मीटर अॅल्युमिनियम तार

असा एकूण २.२४ लाख रुपयांचा माल जप्त केला. चौकशीत आरोपीने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचेही मान्य केले.

पोलिसांनी आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे कळंब येथे हजर केले असून त्याच्या साथीदाराच्या शोधासाठी पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई  अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोह. शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण, चापोका रत्नदीप डोंगरे, व चापोका बाबासाहेब गुरव यांच्या पथकाने केली.

करजखेडा हादरलं; जमिनीच्या वादातून पती-पत्नीची निघृण हत्या

धाराशिव – तालुक्यातील करजखेडा येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीची निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज, बुधवार (दि. 13 ऑगस्ट) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मृतांमध्ये सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार यांचा समावेश असून, या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जमिनीचा वाद ठरला कारणीभूत

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सहदेव पवार आणि आरोपी जीवन हरिबा चव्हाण हे करजखेडा येथे शेजारील शेतकरी आहेत. पवार यांच्या नावे सुमारे 36 एकर जमीन तर चव्हाण यांच्या नावे फक्त 2 एकर जमीन असल्याचे समजते. या जमिनीवरून दोघांमध्ये गेल्या काही काळापासून तीव्र वाद सुरू होता.

काही वर्षांपूर्वी सहदेव पवार यांनी जीवन चव्हाण याला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने पवार यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती, मात्र उच्च न्यायालयातून ते जामिनावर बाहेर आले होते. तेव्हापासून आरोपीच्या मनात तीव्र राग होता.

गाडीने धडक, नंतर कोयत्याने वार

आज दुपारी आरोपी जीवन चव्हाण याने करंजखेडा येथील लोहारा रस्त्यावर पती-पत्नीवर गाडी चढवली. अपघातासारखी घटना घडवून दोघेही जमिनीवर पडताच त्याने कोयत्याने वार करत त्यांची जागीच हत्या केली.

पोलीसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यावेळी आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चढाओढ सुरू केली आहे.

या दुहेरी हत्याकांडामुळे करजखेडा गावात भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

तुळजापूर : मंदिर रक्षणाच्या भूमिकेवर ठाम – आ. जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर जोरदार हल्ला

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या बाबतही बोलले आ. आव्हाड

तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिराची पाहणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भाजप कार्यकर्त्यांनी गाडी अडवून रोखण्याचा प्रयत्न करत मोठा गोंधळ घातला. यानंतर आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत मंदिराच्या संवर्धनाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आणि राज्य सरकार तसेच मंदिर प्रशासनावर जोरदार टीका केली.

“प्रत्येक दगड बोलका आहे”
आव्हाड म्हणाले, “तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्राच्या पुरातन इतिहासाचे जिवंत स्मारक आहे. गाभाऱ्यात उभे राहून छत्रपती शिवाजी महाराज कसे देवीसमोर नतमस्तक झाले असतील, हे मी डोळे मिटून अनुभवतो. या मंदिरातील प्रत्येक दगडाने हा इतिहास पाहिलेला आहे. जर हे दगड बोलू लागले, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू येतील. आज हेच दगड तोडून टाकण्याचा, फेकून देण्याचा प्रकार सुरू आहे. जे अफजलखान आणि औरंगजेबाला जमले नाही, ते आजच्या काळातील त्यांच्या विचारसरणीचे वारस करणार आहेत.”

केंद्रीय व राज्य पुरातत्त्व अहवालांवर प्रश्नचिन्ह
केंद्रीय व राज्य पुरातत्त्व खात्यांच्या अहवालांमध्ये मतभेद असल्याच्या प्रश्नावर आव्हाड यांनी माजी आर्किओलॉजिकल डायरेक्टर ए. के. सिन्हा यांच्या अहवालाचा हवाला दिला. “सिन्हा यांनी स्पष्ट लिहिले आहे की मंदिराला स्पर्श करण्याची गरज नव्हती. दगडालाही श्वास असतो, त्याला ऑक्सिजन मिळतो. चुकीच्या पद्धतीने भेगा भरण्याचे काम केल्याने मंदिराचे आयुष्य कमी होईल,” असे ते म्हणाले.

बहुजनांचा सहभाग संपवण्याचा आरोप
मंदिरातील पूजापद्धतीत बदल आणि बहुजन पुजार्‍यांचा सहभाग कमी करण्याच्या आरोपांवर आव्हाड म्हणाले, “आजपर्यंत इथले सर्व पुजारी बहुजन समाजातील होते. आता नवीन पद्धती, तलवारीचे विधी आणून हा वारसा संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भक्तीस्थळाचा वापर राजकारणासाठी करणे योग्य नाही. बहुजनांचा सहभाग संपवून, त्याच बहुजनांना पुढे करून मनोविकास साधण्याचा डाव आहे.”

विचारांवर ठाम
माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्याशी वैयक्तिक स्नेह असल्याबाबत विचारले असता ते माझ्या बापासारखे आहेत असे आव्हाड म्हणले तसेच आमदार राणा पाटील हे मंदिराचे विश्वस्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असल्याच्या प्रश्नाबाबत आव्हाड म्हणाले, “विचारांपुढे कुणी चालत नाही – मग तो मित्र, बहीण, आई-वडील का असेना. शाहू, फुले, आंबेडकर यांनी कधीच तडजोड केली नाही. तसंच मीही विचारधारेत तडजोड करणार नाही.”

“देवीचा शाप लागेल” – इशारा
पुढील भूमिकेबाबत आव्हाड म्हणाले, “विकासाला विरोध नाही, पण चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामाला मी विरोध करणारच. पारंब्यांची निर्दयी तोड झाली आहे. अशाच पद्धतीने दगड तोडले गेले, तर देवीचा शाप यांना लागेल. मंदिराचे अयोग्य काम मी होऊ देणार नाही.”

धाराशिवसह राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचा लाभ; 28.32 कोटींचे वितरण मंजूर

मुंबई, 12 ऑगस्ट 2025: महाराष्ट्र शासनाने सन 2022-23 च्या कांदा अनुदान योजने अंतर्गत फेरछाननीनंतर पात्र ठरलेल्या 14,661 शेतकऱ्यांना 28,32,30,507 रुपयांचे अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने 12 ऑगस्ट 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये, जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 272 शेतकऱ्यांना 1.20 कोटी रुपये (12,098,705.50 रुपये) मिळणार आहेत.

योजनेचा तपशील
27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक आणि नाफेड केंद्रांमार्फत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही शेतकऱ्यांचे प्रस्ताव 7/12 उताऱ्यावरील नोंदींमुळे अपात्र ठरले होते. त्यांची फेरछाननी करून पणन संचालक, पुणे यांनी पात्र शेतकऱ्यांचा अहवाल सादर केला. त्यानुसार, जुलै 2025 च्या पावसाळी अधिवेशनात 28.32 कोटींची पुरवणी मागणी मंजूर झाली.

जिल्हानिहाय लाभार्थी आणि अनुदान
शासन निर्णयानुसार, खालील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे:

  • नाशिक: 9,988 लाभार्थी, 18.58 कोटी रुपये
  • धाराशिव: 272 लाभार्थी, 1.20 कोटी रुपये (कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत)
  • पुणे ग्रामीण: 277 लाभार्थी, 78.24 लाख रुपये
  • सांगली: 22 लाभार्थी, 8.07 लाख रुपये
  • सातारा: 2,002 लाभार्थी, 3.03 कोटी रुपये
  • धुळे: 43 लाभार्थी, 5.71 लाख रुपये
  • जळगाव: 387 लाभार्थी, 1.06 कोटी रुपये
  • अहमदनगर: 1,407 लाभार्थी, 2.81 कोटी रुपये
  • नागपूर: 2 लाभार्थी, 26,800 रुपये
  • रायगड: 261 लाभार्थी, 68.76 लाख रुपये

एकूण: 14,661 लाभार्थी, 28.32 कोटी रुपये

यामध्ये बहुतांश अनुदान कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत विक्री केलेल्या शेतकऱ्यांना मिळेल, तर खाजगी बाजारातून विक्री केलेल्या 354 शेतकऱ्यांना 52.52 लाख रुपये मिळतील. थेट पणन परवानाधारक आणि नाफेड केंद्रांमार्फत कोणतेही अनुदान पात्र ठरले नाही.

धाराशिव जिल्ह्याचा विशेष उल्लेख
धाराशिव जिल्ह्यातील 272 शेतकऱ्यांना 1,20,98,705.50 रुपये अनुदान मिळणार आहे, जे पूर्णपणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत विक्री केलेल्या कांद्यावर आधारित आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल.

अंमलबजावणी आणि अहवाल
हे अनुदान 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक व्ही-2, लेखाशीर्ष 2425 अंतर्गत खर्ची टाकले जाईल. पणन संचालनालय, पुणे यांना आहरण आणि संवितरण अधिकारी, तर पणन संचालक, महाराष्ट्र राज्य यांना नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अनुदान वितरित केल्यानंतर एका महिन्याच्या आत पणन संचालकांना शासनाला अहवाल सादर करावा लागेल.

धाराशिव तहसीलदारांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप; चौकशीसाठी तुकाराम मुंढे किंवा प्रवीण गेडाम यांची नेमणूक करण्याची मागणी

धाराशिव – धाराशिव तहसीलदार सौ. मृणाल जाधव यांच्यावर एनए लेआउट प्रकरणात गंभीर भ्रष्टाचार व अनियमिततेचे आरोप होत असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे किंवा प्रवीण गेडाम यांची नेमणूक करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

धाराशिव तालुक्यातील मनोज दगडू जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार मृणाल जाधव यांनी पदाचा गैरवापर करून एनए लेआउट करताना नियमबाह्य पद्धतीने कामकाज केले, शासनाची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचे महसुली नुकसान केले. या प्रकरणावर विधिमंडळात विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न उपस्थित केला असता महसूलमंत्री यांनी चौकशीसाठी समिती नेमण्याची घोषणा केली.

या चौकशीसाठी नांदेड येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असली, तरी संबंधित अधिकाऱ्यांची धाराशिवच्या तहसीलदारांशी आधीच्या कार्यकाळातील जवळीक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशी निष्पक्ष न होण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, तपास दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

याशिवाय, एका सामाजिक कार्यकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीत मृणाल जाधव यांच्या नावे 100 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा दावा केला असून, या प्रकरणातील कार्यवाहीही प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

धाराशिव तहसीलदारांवरील भ्रष्टाचार, मालमत्ता अनियमितता आणि एनए लेआउटमधील गैरव्यवहाराची चौकशी तुकाराम मुंढे किंवा प्रवीण गेडाम यांच्यासारख्या निडर व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे देण्यात यावी, अशी धाराशिव तालुक्यातील जनतेची मागणी आहे.

निवेदनाची प्रत महसूलमंत्री, माजी मंत्री बच्चू कडू, लोकायुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विरोधी पक्षनेते, गुप्त वसुली संचालनालय (ईडी), विभागीय आयुक्त तसेच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनाही देण्यात आली आहे.