ईटचा ‘रणसंग्राम’ शांत; उमेदवारांचे राजकीय भवितव्य ‘पेटी’बंद!

0
77


ईट ( सोमेश्वर स्वामी )
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा आज ईट गटात शांत झाला. सकाळपासूनच मतदारांमध्ये असलेला प्रचंड उत्साह आणि नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईनंतर, आता ईट जि.प. व पं.स. उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत (EVM) कैद झाले असून, निकालाच्या प्रतीक्षेने सर्वांची धाकधूक वाढली आहे.

विजयाचा गुलाल कोणाचा?

ईट गटात यंदा चौरंगी आणि अटीतटीची लढत पाहायला मिळाली. प्रचाराच्या रणधुमाळीत उमेदवारांनी गावोगावी सभा आणि वैयक्तिक गाठीभेटी घेऊन मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागातील मतदारांनी दिलेला कौल कोणाच्या बाजूने झुकणार, ईटच्या विकासाची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार आणि ‘विजयाचा गुलाल’ कोणाच्या नशिबात आहे, याचे उत्तर आता ९ फेब्रुवारीला स्पष्ट होईल.

नेत्यांच्या प्रतिष्ठेची ‘कसोटी’

या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारांनी आपला ‘अधिकार’ बजावून उमेदवारांच्या नशिबावर शिक्कामोर्तब केले आहे. ईटच्या या राजकीय सारीपाटावर कोण बाजी मारणार आणि कोणाचा ‘चेकमेट’ होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सध्या तरी उमेदवारांचे भवितव्य ‘चिडीचूप’ असून, पेटीत बंद झालेल्या या निकालाचा गुपित ९ तारखेलाच उघडणार असल्याने याची प्रतीक्षा भुम तालुक्यातील नागरिकांना लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here