खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी घेतला आढावा, आ. कैलास पाटील आ. प्रवीण स्वामी यांची उपस्थिती
धाराशिव, 03 सप्टेंबर 2025: धाराशिव-सोलापूर-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या खर्चात तब्बल 900 कोटींवरून 3000 कोटींवर वाढ झाल्याने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. दिशा समितीच्या सात तास चाललेल्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत केंद्र सरकारच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, रेल्वे प्रकल्पाच्या खर्चवाढीचे कारण आणि त्याची आकडेवारी मागवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खा. राजेनिंबाळकर यांनी सांगितले की, 2000-2014 मध्ये घोषित झालेल्या या रेल्वे मार्गाचे काम 2019 पर्यंत प्रगतीपथावर नव्हते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे धाराशिव ते सोलापूर रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले असून, मार्च 2026 पर्यंत इंजिन ट्रायल पूर्ण होईल. मात्र, तुळजापूर ते सोलापूर या मार्गाचे टेंडर अद्याप बाकी आहे. यापूर्वी रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) 900 कोटी रुपये होता, परंतु आता हा खर्च 3000 कोटींवर गेला आहे. “ही किंमत का वाढली? कोणत्या संरचना यात समाविष्ट केल्या, ज्यामुळे खर्चात वाढ झाली? याची सविस्तर आकडेवारी मला द्या,” अशी विचारणा त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली. तसेच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दिशा समितीचा आढावा आणि इतर प्रकल्प:
दिशा समितीच्या बैठकीत केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यात राष्ट्रीय महामार्ग, एमएसआयडीसी रस्ते प्रकल्प आणि सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड हायवेचा समावेश आहे. खा. राजेनिंबाळकर यांनी येरमळ्याजवळील रस्त्याचे अपूर्ण काम आणि त्यामुळे वाढलेल्या चोरीच्या घटनांवरही लक्ष वेधले. “हा रस्ता जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल,” असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, धाराशिव जिल्ह्यात इटकूर आणि तेरखेडा येथे नवीन पोस्ट ऑफिसेस मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय, 118 नवीन पोस्ट ऑफिसेसच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर स्थगितीचा परिणाम:
खा. राजेनिंबाळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींहून अधिक निधीवर राज्य सरकारने लादलेल्या स्थगितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील औषधांचा तुटवडा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कॅथलॅब सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम रखडले आहे. “हा जनतेचा पैसा आहे, सरकार फक्त विश्वस्त आहे. तरीही काही लोक स्वतःच्या वडिलोपार्जित मालमत्तेसारखे वागतात. अशा नीचवृत्तीच्या राजकारणाला जनता आता ओळखते आहे,” अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
मराठा आरक्षण आणि सरकारच्या वचनांचा मुद्दा:
मराठा आरक्षणाबाबत बोलताना खा. राजेनिंबाळकर यांनी सरकारने मनोज जरंगे-पाटील यांना दिलेले वचन पाळण्यात अपयश आल्याचे सांगितले. “मराठा समाज स्वयंस्फूर्तपणे रस्त्यावर उतरला होता. सरकारने जीआर काढून काही गोष्टी मान्य केल्या, पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, अन्यथा समाजाची फसवणूक होईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाबाबत लक्ष्मण हाके यांच्या टीकेवर, “वचन देणाऱ्यांना विचारा, त्यांनी काय शब्द दिला होता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वे प्रकल्पाच्या खर्चवाढीवर प्रश्न उपस्थित करताना स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच, राज्य सरकारच्या निधीवरील स्थगितीमुळे जनतेच्या हिताच्या कामांना खीळ बसत असल्याची खंत व्यक्त केली.
- धाराशिव जिल्ह्यात भाजप शिवसेनेपेक्षा केवळ 3 टक्क्यांनी पुढे
- परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी चुरशीचे मतदान;७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!
- ईटचा ‘रणसंग्राम’ शांत; उमेदवारांचे राजकीय भवितव्य ‘पेटी’बंद!
- तेर मध्ये आम आदमी फोडतोय प्रस्थापितांना घाम!
- मेघराज पाटील यांचा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र
