बांधकाम कामगारांची मध्यान्ह भोजन योजना अखेर बंद !
गेल्या अनेक दिवसांपासून घोटाळ्यांमुळे चर्चेत असलेली बांधकाम कामगारांची मध्यान्ह भोजन योजना अखेर बंद करण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर रोजी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम कामगारांना पोटभर जेवण मिळावे यासाठी सुरू केलेली योजना घोटाळेबाजांचे पोट भरत होती. धाराशिव जिल्ह्यात या योजनेत अनियमितता असल्याचा अहवाल देखील आहे. तसेच आ. कैलास पाटील यांनी देखील या योजनेबाबत विधिमंडळात आवाज उठवला होता. त्या प्रश्नावर मंत्र्यांनी दिलेले उत्तर खोटे असल्याचा आरोप आ. पाटील यांनी त्यावेळी केला होता. धाराशिव जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजन योजनेत जवळजवळ २८ हजार कामगारांच्या संशयास्पद नोंदी करून करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचे जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालतून पुढे आले होते. १६ एप्रिलमध्ये त्यांनी एक अहवाल प्रधान सचिव यांनी सादर केला.
