मुंबई / नवी दिल्ली — देशाच्या राजधानी आणि आर्थिक राजधानीत आज दोन महत्त्वपूर्ण राजकीय आंदोलनांचे वातावरण तापले आहे. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने ‘जनआक्रोश आंदोलन’ाची हाक दिली असून, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा निघणार आहे.
मुंबईत ‘जनआक्रोश आंदोलन’
देशाची आर्थिक राजधानी देखील आंदोलनाने ढवळून निघणार असून मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11 वाजल्यानंतर हे आंदोलन होणार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहणार असून, या आंदोलनात केवळ शिवसैनिकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाकरे गटाने महायुती सरकारवर तीव्र आरोप करत, भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा मुद्दा उचलून धरला आहे. अलीकडेच ‘हनीट्रॅप’सह विविध भ्रष्टाचार प्रकरणांमुळे महायुतीतील काही मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मुख्य मागणी ठाकरे गटाची आहे.
उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, “सरकारने अशा मंत्र्यांना पाठीशी घालण्याऐवजी कायद्याच्या कक्षेत कारवाई केली पाहिजे. अन्यथा राज्यभरात आंदोलनाची तीव्रता वाढेल.” या पार्श्वभूमीवर आज फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यातील अनेक जिल्ह्यांत जनआक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा
दुसरीकडे, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे सर्व खासदार आज एकत्र येत केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये ‘मतांची चोरी’ झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने आयोगावर थेट दबाव आणण्याचे धोरण आखले आहे.
विरोधी पक्षातील खासदारांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाने मतमोजणीत पारदर्शकता राखली नाही आणि निष्पक्षपणे काम करण्यात अपयश आले. यामुळे मतमोजणी प्रक्रियेत फेरफार होऊन सत्ताधारी पक्षाला लाभ मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. या संदर्भात आयोगाकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
आयोगाकडून विरोधी खासदारांना भेटण्यासाठी दुपारी 12 वाजता वेळ देण्यात आली असून, एकूण 30 जणांच्या प्रतिनिधीमंडळाला प्रवेशाची परवानगी दिली आहे. या भेटीत आंदोलनाचे निवेदन अधिकृतरीत्या आयोगाला सादर केले जाणार आहे.
आजच्या या दोन आंदोलनांकडे देशभराचे लक्ष लागले आहे. एकीकडे मुंबईत राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात शिवसेनेचे रस्त्यावर उतरलेले आंदोलन आणि दुसरीकडे दिल्लीत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा विरोधी पक्षांचा मोर्चा — या दोन्ही घडामोडी आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतात.
- ईट नगरीत कडाडणार शड्डूचा आवाज! खोपेश्वर महादेवाच्या पावन भूमीत रंगणार कुस्तीचा महासंग्राम
- विभागीय आयुक्त खोटे? अनंत कुंभार यांचा ‘नोटीस चुकून’ आल्याचा अजब दावा
- घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या हॉटेलवर तहसील प्रशासनाची कारवाई, गुन्हा दाखल
- भाजप नेते धनंजय सावंत यांच्या गाडीला अपघात
- आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप
