सलगरा,दि.१०(प्रतिक भोसले)
खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिवसेनेच्या सध्याच्या कसोटी मध्ये संजय राऊतांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. मात्र आता १०० दिवसांनी संजय राऊत यांना दि.९ नोव्हेंबर, बुधवार रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. आता तब्बल १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला असून पीएमएलए कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे.
संजय राऊत आणि त्यांचा भाऊ प्रवीण राऊत या दोघांनाही पीएमएलए कोर्टाने पत्राचाळ घोटाळ्यात जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत जेलमध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, अंधेरीची पोटनिवडणूक, सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, दसरा मेळावा या पेक्षा संजय राऊत यांचं बाहेर येणं महत्त्वाचं मानलं जातं आहे. त्या मुळे संजय राऊत आता पहिल्यासारखेच धडाडणार की काही दिवस शांत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाला मोठं बळ मिळालं आहे. त्यामुळे शिवसेनेतून आनंद व्यक्त केला जात असून उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिक जल्लोष करताना दिसत होते. त्या मध्ये असाच जल्लोष तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील शिवसैनिकांनी काल संध्याकाळी ०७ वा.सु. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, घोषणा देत पेढे वाटून साजरा केला.