उस्मानाबाद -महाविकास आघाडी सरकारने सरसकट शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा घेतलेला तुघलकी निर्णय अत्यंत चुकीचा व तितकाच दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम होत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी व दुर्गम/अतिदुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. दोन वर्षांपासून शाळा,महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी वाढुन सर्वसामान्य जनतेची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जात आहेत. यामुळे मुलांचे शिक्षणाचे गांभीर्य नष्ट होत असून त्यांचे नुकसान होत आहे.
राज्यभरात सर्वच व्यवसाय कोरोना निर्बंधासहीत सुरु आहेत. तेव्हा सरकारने कोरोनाचे नियम लावून शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी शैक्षणिक संस्था जिल्हाध्यक्ष पांडूरंग लाटे,सुधीर पाटील,रामदास कोळगे, गणेश एडके,राजसिंहा राजेनिंबाळकर,प्रभाकर मुळे,विनोद राठोड यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.